यवतमाळ : मालमत्ता आणि शरीरासंबंधीच्या गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी निर्दोष का सुटले, असा जाब विचारत जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी ठाणेदारांना सोमवारी लेखाजोगा सादर करण्याचे निर्देश दिले आहे. १२ जानेवारी रोजी जिल्ह्यातील ठाणेदार व पोलीस अधिकाऱ्यांची बैठक यवतमाळात होत आहे. जिल्ह्याचे गंभीर गुन्ह्यांमधील घटलेले शिक्षेचे प्रमाण या प्रमुख विषयावर ही बैठक केंद्रीत करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यात सत्र आणि प्रथमश्रेणी न्यायालयांमधील खटल्यांमध्ये शिक्षेचे प्रमाण घटले आहे. अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये आरोपी निर्दोष झाले. हे आरोपी निर्दोष सुटण्यामागे पोलिसांची तपासात हयगय आहे का, यावर संजय दराडे यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. सोमवारच्या क्राईम मिटींगमध्ये त्यावरच भर राहणार आहे. त्यासाठी सर्व ठाणेदारांना शिक्षा व निर्दोषत्वाच्या प्रमाणाची अपडेट माहिती घेऊन हजर होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. दारव्हा उपविभागात शरीरासंबंधीच्या गुन्ह्यातील अनेक आरोपी निर्दोष झाले आहे. पुसद उपविभागात दरोडा व जबरी चोरी, यवतमाळ उपविभागात मालमत्तेच्या गुन्ह्यात, पांढरकवडा विभागात दारूबंदी व जुगार तर वणी उपविभागात महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये आरोपी निर्दोष झाले आहे. या निर्दोषत्वामागील नेमकी कारणे काय, याचे प्रेझेंटेशन संबंधित एसडीपीओंना करावे लागणार आहे. सध्या कोणत्या कोर्टामध्ये किती खटले सुरू आहेत, समन्स, वॉरंट, मुद्देमाल आदी मुद्यांवरही या बैठकीत चर्चा होईल. मुकुटबन ठाणेदारांनी प्रतिबंधात्मक कारवाई तर दारव्हा ठाणेदारांनी गुन्ह्यातील शिक्षेचे प्रमाण यावर नाशिक येथे खास प्रशिक्षण घेतले आहे. त्याबाबत ते आता जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना अवगत करणार आहे. जिल्ह्यात आरोपी निर्दोष सुटण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यासाठी पंच, साक्षीदार, जवळचे नातेवाईकच फितूर झाले, हे ढोबळ कारण पोलिसांकडून बचावासाठी दिले जात असले तरी मुळात सदोष दोषारोपपत्र ही बाब त्यासाठी कारणीभूत ठरत असल्याचे सांगितले जाते. अनेकदा हितसंबंध जोपासून दोषारोपपत्र तयार केले जाते. त्याचा फायदा न्यायालयात आरोपींना होतो. दोषारोपपत्रात त्रुट्या राहू नये, या त्रुट्या दूर करता याव्या म्हणून न्यायालयात ते पाठविण्यापूर्वी वरिष्ठांकडून, विधी अधिकाऱ्यांकडून तपासण्याची व्यवस्था आहे. मात्र त्यानंतरही आरोपी निर्दोष सुटत असल्याने पोलीस प्रशासनाची चिंता वाढली आहे. आगामी क्राईम मिटींग या निर्दोषत्व आणि सदोष दोषारोपपत्रावर गाजण्याची चिन्हे आहे. आरोपी निर्दोष सुटू नये, शिक्षेचे प्रमाण वाढावे, त्यासाठी गुन्हा सिद्ध करता यावा म्हणून गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात आणखी ४५ नवीन न्यायवैद्यक पथके स्थापन करण्याचा निर्णय शुक्रवारी मुंबईत जाहीर केला. यावरून गृहमंत्री शिक्षेच्या प्रमाणाबाबत गंभीर असल्याचे स्पष्ट होते. (प्रतिनिधी)
गंभीर गुन्ह्यांतील आरोपी निर्दोष सुटले कसे ?
By admin | Updated: January 10, 2015 23:03 IST