दुष्काळातही पीक परिस्थिती उत्तम कशी?
By Admin | Updated: October 1, 2014 23:29 IST2014-10-01T23:29:00+5:302014-10-01T23:29:00+5:30
पावसाची सुरूवातीपासून दडी, विविध किडींचे आक्रमण अशा स्थितीत शेतकरी हतबल असताना महसूल प्रशासनाने जिल्ह्याची पैसेवारी उत्तम असल्याचा खळबळजनक अहवाल सादर केला आहे.

दुष्काळातही पीक परिस्थिती उत्तम कशी?
नजर पैसेवारी जाहीर : २०५० गावांची पैसेवारी तब्बल ५७ टक्के !
यवतमाळ : पावसाची सुरूवातीपासून दडी, विविध किडींचे आक्रमण अशा स्थितीत शेतकरी हतबल असताना महसूल प्रशासनाने जिल्ह्याची पैसेवारी उत्तम असल्याचा खळबळजनक अहवाल सादर केला आहे. जिल्ह्यातील २०५० गावांची नजर पैसेवारी ५७ टक्के असल्याचा अहवाल आहे. शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळण्याच्या या प्रकाराने शेतकरी पुरता हादरला आहे.
गत दशकापासून यवतमाळ जिल्हा निसर्ग प्रकोपाचा सामाना करीत आहे. यावर्षी त्यात आणखी भर पडली. मृग आणि रोहीणी नक्षत्र कोरडे गेल्याने पेरण्या महिनाभर लांबल्या. नंतरच्या काळात थोडा पाऊस बरसला. त्यानंतर पडलेल्या कडक उन्हाने पीक वाळत आहेत. अनेक ठिकाणी उंट अळीचा प्रकोप झाला. कपाशीवर लाल्याचे आक्रमन झाले आहे. तर वेळेपुर्वीच सोयाबीन वाळायला सुौवात झाली आहे. शेंगामधील दाने भरणार किंवा नाही अशी अवस्था निर्माण झाली आहे. काही शेतकऱ्यांनी तर चक्क जनावरे आपल्या शेतात चराईसाठी सोडले आहेत. अशा बिकट परिस्थित कर्जाची परतफेड करायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. (शहर वार्ताहर)