घरे, फळबागांचे नुकसान
By Admin | Updated: May 9, 2016 02:28 IST2016-05-09T02:28:48+5:302016-05-09T02:28:48+5:30
तालुक्याला गेली दोन दिवस झालेल्या वादळाचा जबरदस्त तडाखा बसला. अनेकांच्या घरांचे नुकसान झाले. केळी जमीनदोस्त झाली.

घरे, फळबागांचे नुकसान
जनावरे ठार : नेर तालुक्यातील वादळग्रस्तांची तालुका प्रशासनाकडे भरपाईची मागणी
नेर : तालुक्याला गेली दोन दिवस झालेल्या वादळाचा जबरदस्त तडाखा बसला. अनेकांच्या घरांचे नुकसान झाले. केळी जमीनदोस्त झाली. काही जनावरे मृत्युमुखी पडली. अवकाळी पावसामुळे आणि वादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून भरपाई देण्यात यावी, अशी नुकसानग्रस्तांची मागणी आहे.
तालुक्यात शुक्रवारी वादळ आणि गारांसह पाऊस झाला. टाकळी (सलामी) येथील सारंग वसंत जाधव यांच्या शेतातील केळीची ५५० झाडे जमिनदोस्त झाली. नेर येथील छगन बबन माकोडे यांचे घर कोसळले. त्याखाली दबून बोकड ठार झाला. या घटनेत त्यांचे ५० हजारांचे नुकसान झाल्याचा अंदाज तहसील प्रशासनाने व्यक्त केला. खुशाल महादेव मिसाळ यांच्या गोठ्यावरील टीनपत्रे उडाली. पिंपळगाव (डुब्बा) येथे चार घरांचे, सावंगा येथे दोन घरे आणि लोनाडी येथे तीन घरांचे नुकसान झाले.
सिंदखेड येथे एका घरावर झाड कोसळले. बाळेगाव येथील अनिल पुंडलिक इंगोले यांच्या गायीचे वासरू वादळाने ठार झाले. पिंपळगाव (काळे) येथील २५ घरांवरील टिनपत्रे उडाली. घर कोसळल्याने याच गावातील लक्ष्मण अमरसिंग चव्हाण (६५), सारिका राजू कुरखंडे (३५) जखमी असून त्यांच्यावर यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.
जीवन जुनघरे (३२), दिनेश मांडुळकर (२५), प्रवीण जाधव (२८) हेसुद्धा जखमी झाले आहेत. वटफळी येथे तीन घरे व फळबागा, मालखेड (बु) येथे प्रशांत उत्तम चव्हाण व बबिता उत्तम चव्हाण यांची फळबाग उद्ध्वस्त झाली.
खरडगाव येथे सुखदेव श्यामराव गुल्हाने यांचा गोठा कोसळून एक बैल ठार झाला, तर याच गावातील सहा घरांवरील टिनपत्रे उडाली. वादळामुळे विद्युत खांब कोसळल्याने अनेक गावांमधील वीज पुरवठा खंडित झाला होता. प्रशासनाने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून भरपाई द्यावी, अशी मागणी आहे. नुकसानग्रस्तांमध्ये शेतकऱ्यांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. ते आर्थिक अडचणीत आहेत. अशावेळी त्यांना मदतीची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)