गृहरक्षकदलाच्या जवानाची न्यायासाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 22:01 IST2018-01-28T22:01:03+5:302018-01-28T22:01:12+5:30

 House of Wreath for Justice | गृहरक्षकदलाच्या जवानाची न्यायासाठी भटकंती

गृहरक्षकदलाच्या जवानाची न्यायासाठी भटकंती

ठळक मुद्देअंथरुणावर खिळून : अपघातानंतर पोलिसांकडून बेदखल

लोकमत न्यूज नेटवर्क
शेंबाळपिंपरी : शासकीय कामासाठी हिंगोली येथे जात असताना झालेल्या अपघातानंतर गृहरक्षक दलाचा जवान दोन वर्षांपासून अंथरुणावर खिळून आहे. न्यायासाठी त्याने पोलीस विभागातील अधिकाऱ्यांकडे दाद मागितली. परंतु अद्यापही त्याला कुणी मदतीचा हात दिला नाही. आता त्याच्याजवळ वैद्यकीय खर्चासाठी पैसे नसल्याने उपेक्षेचे जीणं जगत आहे.
तुकाराम महादू हजारे (४८) रा. शेंबाळपिंपरी असे गृहरक्षक दलाच्या जवानाचे नाव आहे. तो शेंबाळपिंपरी येथील पोलीस चौकीत कार्यरत होता. तो ९ फेब्रुवारी २०१६ रोजी व्हिसेरा घेऊन हिंगोलीकडे जात होता. त्यावेळी अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात तो गंभीर जखमी झाला. पोलिसांनी सुरुवातीला खासगी रुग्णालयात दाखल करून उपचार केले. मात्र परिस्थिती गंभीर असल्याने नांदेड, पुणे व वर्धा येथे उपचार करण्यात आले. मात्र तो बरा झाला नाही. अशा अवस्थेतच घरी आणण्यात आले. या अपघाताने त्याला ५२ टक्के अपंगत्व आले आहे. प्लास्टिक सर्जरी केल्याशिवाय पर्याय नाही. परंतु पोलिसांनी हातवर केल्याने आता त्याच्यावर भीक मागण्याची वेळ आली आहे. शासकीय मदतीसाठी त्याने विविध ठिकाणी अर्ज दिले. परंतु अद्यापही त्याला मदत मिळाली नाही.
दरम्यान तुकाराम हजारे यांची हलाखीची परिस्थिती पाहून आमदार मनोहरराव नाईक यांनी वैद्यकीय खर्च भागविण्यासाठी तातडीने प्रयत्न करण्याचे निर्देश खंडाळा पोलिसांना दिले आहे. आता काय निर्णय लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title:  House of Wreath for Justice