भगवान बुद्धांच्या पवित्र अस्थी येणार यवतमाळात
By Admin | Updated: September 7, 2015 02:21 IST2015-09-07T02:21:35+5:302015-09-07T02:21:35+5:30
धम्मचक्र प्रवर्तन ही जगाच्या इतिहासातील अविस्मरणीय घटना आहे. या ऐतिहासिक दिवसाला यंदा यवतमाळ जिल्हावासीयांच्या दृष्टीने आणखी महत्त्व प्राप्त होणार आहे.

भगवान बुद्धांच्या पवित्र अस्थी येणार यवतमाळात
१४ आॅक्टोबर : दी बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडिया जिल्हा शाखेचा पुढाकार
यवतमाळ : धम्मचक्र प्रवर्तन ही जगाच्या इतिहासातील अविस्मरणीय घटना आहे. या ऐतिहासिक दिवसाला यंदा यवतमाळ जिल्हावासीयांच्या दृष्टीने आणखी महत्त्व प्राप्त होणार आहे. मानवाला खरे जीवनज्ञान देणाऱ्या भगवान बुद्धांच्या पवित्र अस्थी १४ आॅक्टोबर रोजी यवतमाळात येणार आहे. दी बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडियाच्या जिल्हा शाखेने त्यासाठी पुढाकार घेतला आहे.
हा पवित्र अस्थी श्रीलंकेतून मुंबईत येतील. त्यानंतर नागपूर मार्गे यवतमाळला आणाला जाईल. अस्थी रथासोबत श्रीलंकेतील महाबोधी सोसायटीचे अध्यक्ष भदंत बानागल उपतिस्स नायकथेरो उपस्थित राहणार आहे. तसेच मुंबईतून आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले रथासोबत यवतमाळात येणार आहेत. त्यानंतर १६ आॅक्टोबर रोजी हा अस्थी रथ वर्धा-हिंगणघाट मार्गे चंद्रपुरात जाणार आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनी जिल्ह्यातील नागरिकांना भगवान बुद्धांच्या अस्थींचे दर्शन घेण्याची अविस्मरणीय संधी या निमित्ताने मिळणार आहे. जिल्ह्यातील संपूर्ण नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. श्रीलंका सरकारने भगवान बुद्धांच्या जीवनावर ‘सीरी सिद्धार्थ गौतम’ हा चित्रपट तयार केला आहे. त्यात भगवान बुद्धांची भूमिका करणारे अभिनेते गगनजी मलिक या अस्थी रथासोबत यवतमाळात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
पत्रकार परिषदेला विदर्भ अध्यक्ष पद्माकर गणवीर, उपाध्यक्ष मनोहर दुपारे, केंद्रीय सदस्य अॅड. भीमराव कांबळे, शहर महासचिव मिलिंद डांगे, सुखदेव जाधव, गोविंद मेश्राम, जिल्हाध्यक्ष धर्मपाल माने, सचिव जयकृष्ण बोरकर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तालुका शाखांचे पदाधिकारी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)
श्रीलंकेतील नीलगिरी सह्य स्तुपातील पवित्र अस्थी
श्रीलंकेतील नीलगिरी सह्य स्तुपात या पवित्र अस्थी सापडलेल्या आहेत. श्रीलंका सरकारच्या पुरातत्त्व खात्याने त्या प्रमाणित केल्या आहेत. बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रबोधी पाटील यांनी श्रीलंकेकडे पाठपुरावा केल्यानंतर तेथील सरकारने भारतात अस्थी नेण्याची परवानगी दिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षाच्या निमित्ताने या अस्थींचे भारतात आगमन होत आहे. भारतात दर्शन झाल्यानंतर पुन्हा २४ आॅक्टोबरला अस्थी श्रीलंकेत परत जाणार आहेत. या अस्थी रथाला श्रीलंका सरकार तसेच महाराष्ट्र सरकारकडून विशेष सुरक्षा प्रदान केली जाणार आहे.