हिंदी-मराठी गीतांची मेजवाणी
By Admin | Updated: January 25, 2016 03:47 IST2016-01-25T03:47:30+5:302016-01-25T03:47:30+5:30
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना

हिंदी-मराठी गीतांची मेजवाणी
यवतमाळ : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याच्या हेतूने संगीत क्षेत्रातील दिग्गज कलावंतांचा ‘स्वरांजली’ हा हिंदी-मराठी सुमधूर गीतांचा कार्यक्रम समता मैदानात शनिवार, २३ जानेवारीला आयोजित करण्यात आला होता.
दीप प्रज्वलनानंतर पं.सुरेश वाडकर यांनी प्रारंभी ‘ओंकार स्वरूप, सद्गुरू समर्था’ हे भक्तिगीत सादर करून दमदार सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी सलगपणे ‘फिर कुछ नही भाता, जब प्रेम रोग लग जाता’, ‘और इस दिल मे क्या रखा है, ये तेरा ही दर्द छुपा रखा है’ आणि ‘लगी आज सावन की फिर ओ झडी है’ ही गाणी सादर करून हवेतील गारवा पळवून लावला. त्यानंतर आघाडीचा गायक आणि पंडितजींचा शिष्य स्वप्नील बांदोडकर यांनी तरुणांना डोलायला लावले. टाईमपास चित्रपटातील ‘मला वेड लागले प्रेमाचे’ या गाण्यापासून ‘जाऊ नको दूर तू, अशी ये समोर तू’ ‘राधा ही बावरी’ ‘शिवसेना गीत’ गाऊन प्रचंड ऊर्जा निर्माण केली.
पंडितजींचे दुसरे शिष्य अमेय दाते यांनी विठ्ठल माऊलींचे स्मरण करून देवा श्री गणेशाला वंदन केले. ‘मोहब्बत बरसा देना तू, सावन आया है’ ही सर्वांगसुंदर गाणी म्हणून रसिकांना डोलायला लावले.
संगीताची साधक साधना सरगम यांनी त्यांचे अत्यंत आवडते गाणे ‘निले-निले अंबर पर, चांद जब आये’ ने श्रोत्यांना जिंकून घेतले. गाण्यांचा गुलदस्ता सादर करताना ‘हर किसी को नही मिलता यहां प्यार जिंदगी मे’ ‘सात समंदर पार मै तेरे पिछे पिछे आ गयी’ ही अजरामर गाणी सादर केली. सुरेश वाडकर आणि साधना यांनी द्वंद्वगीतेही सादर केली. ‘मै तुझे कल भी प्यार करता था, मै तुझे अब भी प्यार करता हू’ ‘तुझ्या माझ्या संसाराला आणिक काय हवं’ ‘तुमसे मिलके ऐसा लगा’ या गाण्यांवर अनेकांना ठेका धरला.
सूत्रसंचालन अभिजित खांडकेकर यांनी पंडितजींना बाळासाहेबांच्या काही आठवणी सांगण्याचा आग्रह केला, तेव्हा ते म्हणाले ‘बाळासाहेबांनी माझ्यावर मुलासारखे प्रेम केले. त्यांच्याशी आमचे घरगुती संबंध होते. त्यांच्या छत्रसायेतच आम्ही वाढलो. बळीराजांच्या प्रेमाखातर मी या कार्यक्रमासाठी आलो आहे व कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पंडित सुरेश वाडकर, स्वप्नील बांदोडकर आणि अमेय दाते यांनी संयुक्तपणे ‘रात के ढाई बजे, कोई शहनाई बजे’ ‘सपने मे मिलती हैं, वो कुडी मेरी सपने मे मिलती हैं’ ‘चप्पा चप्पा चरखा चले’ अशी लोकप्रिय गाणी सादर करून वातावरणात आनंदाची पेरणी केली. पालकमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी, जिल्हा प्रमुख माजी आमदार विश्वास नांदेकर, संतोष ढवळे, प्रवीण पांडे, सर्व पदाधिकारी, अधिकारी आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. थंडी असूनही दिग्गज कलावंतांना प्रत्यक्ष पाहता-पाहता त्यांना ऐकण्याची पर्वणी साधण्यासाठी समता मैदान खचाखच भरले होते.
(सांस्कृतिक प्रतिनिधी)