उच्चभ्रू, सुशिक्षितच फसव्या गुंतवणूकीच्या जाळ्यात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 21:23 IST2017-08-26T21:22:52+5:302017-08-26T21:23:38+5:30
आर्थिक गुंतवणूक करताना मिळणाºया मोबदल्याकडे अधिक लक्ष दिले जाते. प्रत्यक्षात गुंतविली जाणारी रक्कम किती सुरक्षित याचे भानच ठेवले जात नाही.

उच्चभ्रू, सुशिक्षितच फसव्या गुंतवणूकीच्या जाळ्यात !
आर्थिक गुंतवणूक करताना मिळणाºया मोबदल्याकडे अधिक लक्ष दिले जाते. प्रत्यक्षात गुंतविली जाणारी रक्कम किती सुरक्षित याचे भानच ठेवले जात नाही. आर्थिक फसवणुकीची एकामागून एक अनेक प्रकरणे पुढे येत असतानाही डोळे बंद करून गुंतवणूक करणाºयांची संख्याही वाढत आहे. समाजातील सुशिक्षित व उच्चभ्रू घटक या जाळ्यात सर्वाधिक अडकल्याचे पोलिसांकडे असलेल्या प्रकरणातून दिसून येते.
कुणाला १८ महिन्यात दुप्पट रक्कम हवी असते, तर कुणाला फार तुटपुंज्या मोबदल्यात एखाद्या प्राईम लोकेशनवर मालमत्ता मिळणार असल्याचे आमिष दाखविले जाते. संस्था किंवा ग्रुप गुंतवणूक करत असून त्यावर तुम्हाला आमच्या व्यवसायात थेट भागिदारी दिली जाईल, असेही दाखविले जाते. या आमिषाचा फास हळूहळू आवळला जातो. त्यासाठीच जवळच्या व्यक्तीचा पद्धतशीरपणे वापर होतो. एखाद्या कार्यालयातील किंवा कुटुंबातील व्यक्ती अशा आर्थिक गुंतवणुकीच्या स्कीम राबविणाºया संस्थेशी जुळली की त्या व्यक्तीच्या माध्यमातून चेन मार्केटिंग राबविली जाते. ही व्यक्ती आपल्या कुटुंबीयांना, मित्रांना भावनिक साद घालून माझ्याकडे पाहून गुंतवणूक कर, काही बरे-वाईट झाल्यास मी जबाबदारी घेईल, अशी हमी देवून कष्टाने जमविलेला पैसा गुंतवणूक करण्यास भाग पाडते.
जिल्ह्यात सर्वाधिक फसवणूक झालेल्यांची संख्या मैत्रेय या गुंतवणूक कंपनीकडून तब्बल तीन कोटी रुपयांची गुंतवणूक चार हजार नागरिकांची डुबल्याचे उघड झाले आहे. अजून किमान सात कोटींचे गुंतवणुकदार यात फसल्याचे पोलीस तपासात दिसत आहे.
याच पद्धतीने श्रीसूर्या या कंपनीतही ९४ लाख २५ हजारांनी ६५ गुंतवणुकदार अडकले आहेत. समृद्धी प्रा.लि. या कंपनीतही १८० सभासदांचे ७२ लाख रुपये अडकले आहेत. जागृती अॅग्रो प्रा.लि. या कंपनीत ५० सभासदांचे ८० लाखांपेक्षा अधिकची रक्कम अडकली आहे. तसेच व्याजाच्या लालसेपोटी रायसोनी, आर्यरूप आणि इतरही पतसंस्थांमध्ये फसगत झालेल्यांची आकडेवारी हजारोंच्या घरात आहे. आता तर पॅनकार्ड क्लबच्या माध्यमातूनही नवीन प्रकरणे बाहेर येत आहेत. या प्रत्येकच कंपनी संस्थेकडून आम्ही अतिशय कमी गुंतवणुकीत भरपूर मोबदला देत असल्याचे सांगितले जाते.
कायदेशीर पळवाट शोधण्यासाठी प्रत्येकाकडून घेतलेली रक्कम ही ठेवी स्वरूपात न दाखविता गुंतवणूक (शेअर्स) म्हणून दाखविली जाते. यात कुणाला ११ ते १२ टक्के व्याज दिले जाईल, असे आमिष दिले जाते. जागृती अॅग्रोने तर शेळी पालन उद्योगाच्या नावाखाली शेतकºयाचीच जमीन लीजवर घेऊन तिथे शेळी प्रकल्प उभारला. त्या प्रकल्पावर व्यवस्थापक म्हणून त्याच शेतमालकाला नोकरी दिली. त्यासाठी महिना ४० हजारांचे आमिष दाखविले. नंतर त्याच शेतकºयाकडून या प्रकल्पामध्ये दहा लाखांपर्यंतची गुंतवणूक करून घेतली. अशा विविध पद्धतीच्या प्रलोभनातून या कंपन्या सर्वसामान्य व सुशिक्षित बेरोजगारांना आपल्या जाळ्यात ओढत असतात.
शासकीय, निमशासकीय सेवेतून निवृत्त झालेले अधिकारी, कर्मचारीसुद्धा आपल्या पेन्शनची रक्कम अशा ठगबाजांच्या हाती बिनबोभाटपणे देतात. मैत्रेयच्या गुंतवणुकीत तर सर्वसामान्य कुटुंबातील गृहिणींचा समावेश अधिक आहे. त्यांनी आपल्या जवळच्याच महिलांना मैत्रेयमध्ये गुंतवणुकीसाठी बाध्य केले. २००८-०९ पासून हा गुंतवणुकीचा खेळ सुरू आहे. रक्कम छोटी वाटत असल्याने गुंतवणुकदारही फारसी तसदी घेत नाही. याचाच फायदा घेऊन या कंपन्या नेटवर्क मार्केटिंग, चेन मार्केटिंगच्या माध्यमातून हजारो कोटींची माया जमा करण्यात यशस्वी होतात. आता तक्रारी दाखल झाल्यानंतर अनेकजण आर्थिक गुन्हे शाखेत पैसे परत मिळविण्यासाठी चकरा मारताना दिसत आहे. श्रीसूर्याचे समीर जोशी, जागृती अॅग्रोचे राज गायकवाड, समृद्धीचे मोतेवार या ठगबाजांकडून मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याच्या तक्रारी आहेत. त्यानंतरही अनेकांनी या व्यक्तींकडे आपली गुंतवणूक केल्याचे धक्कादायक वास्तवही दिसते.
आर्थिक गुन्हे शाखेत २००१ पासूनच्या प्रकरणांचा तपास सुरू आहे. कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या प्रकरणांचा तपास पोलीस निरीक्षक दिलीप वडगावकर, सहायक पोलीस निरीक्षक नितीन पतिंगे, उपनिरीक्षक प्रेमदास आडे, सहायक फौजदार राजू झाडे, दीपक आस्कर, विजय पवार, सुनील बोटरे आदी करत आहेत.
निवृत्त अपर जिल्हाधिकारीही अडकले जाळ्यात
सेवानिवृत्तीचा पैसा डबल करण्याच्या नादात अपर जिल्हाधिकारीही जागृतीच्या शेळी पालन उद्योगात अडकले. त्यांच्यासोबत बँकेचे सेवानिवृत्त व्यवस्थापक, लोकप्रतिनिधीचे स्वीय सहायक हेसुद्धा विविध गुंतवणुकदार कंपन्यांकडून ठगले आहेत. फसवणूक झालेल्यांमध्ये सर्वसाधारण व अशिक्षित व्यक्तींचा समावेश नगण्य आहे. आर्थिक सुबत्ता व काय चूक-बरोबर याचे ज्ञान असलेली व्यक्तीच अशा ठगांच्या गळाला लागलेली दिसून येते.
आर्थिक गुन्हे शाखेने जिल्ह्यातील संस्था, पतसंस्था व कंपन्या ज्यांच्याकडून आर्थिक व्यवहार केले जातात, अशा सर्वांना पत्र दिले आहे. शिवाय जिल्हा उपनिबंधकांकडे अशा संस्थांची सविस्तर माहिती मागविली आहे. त्यानंतर प्रत्येक महिन्यात बैठक घेऊन जनजागृती केली जाणार आहे. आर्थिक गुन्ह्याचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.
- दिलीप वडगावकर, पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, यवतमाळ