जडीबुटीने मोतिबिंदू दूर करण्याचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 22:20 IST2019-01-18T22:19:30+5:302019-01-18T22:20:22+5:30
डोळ्याचे विविध आजार आणि मोतिबिंदू दूर करण्याचा दावा करून येथे कॅम्प भरविला जात आहे. डोळ्यात औषध टाकण्यासाठी शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांची येथे गर्दी होत आहे. या औषधांची सत्यता आरोग्य विभागाने तपासण्याची गरज आहे.

जडीबुटीने मोतिबिंदू दूर करण्याचा दावा
गजानन अक्कलवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब : डोळ्याचे विविध आजार आणि मोतिबिंदू दूर करण्याचा दावा करून येथे कॅम्प भरविला जात आहे. डोळ्यात औषध टाकण्यासाठी शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांची येथे गर्दी होत आहे. या औषधांची सत्यता आरोग्य विभागाने तपासण्याची गरज आहे.
कोल्हापूर येथील विनायक गुरव व त्यांच्या सहकाऱ्यांच्या पुढाकारात कुठलीही माहिती व फलक न लावता हे कॅम्प भरविले जात आहे. डोळ्यात औषध टाकण्यासाठी प्रत्येकी शंभर रुपये घेतले जाते. एका रुग्णाला पाच ते सहा वेळा औषध टाकण्यास सांगितले जाते. एक रुग्ण पाचशे ते सहाशे रुपये खर्च करीत आहे. सुरुवातीला नगरपंचायतच्या सभागृहात कॅम्प भरविण्यात येत होता. परंतु नगरपंचायतने सभागृह देण्यास मनाई केल्याने आता हा कॅम्प राम मंदिर (उत्तरवाहिनी) येथे भरविला जात आहे. एका दिवशी दीड हजारावर रुग्ण डोळ्यात औषध टाकण्यासाठी गर्दी करीत आहे. संबंधित आयोजक एका दिवशी दीड ते पावणेदोन लाख रुपये जमा करीत आहे. या औषधांचा चांगला परिणाम असल्याने अनेक रुग्ण सांगतात. परंतु काहींना त्रास ही झाला आहे, हे विसरुन चालणार नाही. त्यामुळे आरोग्य विभागाने या औषधांमधील कन्टेन्स् तपासण्याची गरज आहे.
डोळ्याचे आजार दूर होतात - विनायक गुरव
आमच्या आयुर्वदिक औषधांनी मोतिबिंदूसह डोळ्याचे अनेक आजार दूर होतात. आतापर्यंत लाखो रुग्णांना याचा फायदा झाला, असा दावा कोल्हापूर येथील कॅम्प आयोजित करणारे विनायक गुरव यांनी केला.
औषधांची तपासणी करु- डीएचओ
कळंब येथील कॅम्पची माहिती मिळाली आहे. याठिकाणी कुठले औषध डोळ्यात टाकले जाते याची माहिती घेतली जाईल. डोळ्यात टाकलेल्या औषधाने त्रास झालेल्या रुग्णांनी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी धर्मेश चव्हाण यांनी केले.