महागाव कसबातील हेमाडपंथी मंदिराचा जीर्णोद्धार
By Admin | Updated: April 30, 2016 02:40 IST2016-04-30T02:40:08+5:302016-04-30T02:40:08+5:30
प्राचीन वास्तूकलेचा अप्रतिम नमुना असलेल्या विदर्भातील प्राचीन हेमाडपंथी शिव मंदिरांची दुरावस्था आता थांबणार असून ...

महागाव कसबातील हेमाडपंथी मंदिराचा जीर्णोद्धार
गतवैभव प्राप्त होणार : भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाची मोहीम, तज्ज्ञांच्या चमूकडून झाली पाहणी
मुकेश इंगोले दारव्हा
प्राचीन वास्तूकलेचा अप्रतिम नमुना असलेल्या विदर्भातील प्राचीन हेमाडपंथी शिव मंदिरांची दुरावस्था आता थांबणार असून भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण विभाग त्याला गतवैभव प्राप्त करून देणार आहे. याचा प्रारंभ महागाव (कसबा) येथील कमळेश्वर या शिवालयाच्या जीर्णोद्धारापासून होत आहे.
देवगिरीचा राजा रामदेवराय यादव यांच्या काळात बाराव्या शतकात हेमाडपंथी मंदिरांची निर्मिती विदर्भात करण्यात आली. रामदेवराय यादवांचा प्रधान हेमाद्रीपंत यांनी या मंदिराची उभारणी केली. काळ्या पाषाणावर पाषाण रचून ही मंदिरे उभारण्यात आली. यवतमाळ जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात हेमाडपंथी प्राचीन शिवालये आहेत. बाराव्या शतकातील या मंदिरांची अलिकडे मोठी दुरावस्था झाली होती. ठिकठिकाणच्या मंदिरांचे चिरे ढळले होते. तर काही ठिकाणी मंदिरेही खचली आहेत. परंतु आता भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण विभागाने या मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याची योजना केंद्र शासनाने हाती घेतली आहे. त्यासाठी सर्व प्राचीन मंदिरांचे सर्वेक्षण करण्यात आले. शक्य तेथे डागडुजी आणि आवश्यकतेनुसार नवीन बांधकामांची जोड या मंदिरांना दिली जाणार आहे. त्याकरिता केंद्र शासनाने खास बजेटही पुरातत्व विभागाला मंजूर केले आहे. विदर्भातील हेमाडपंथी मंदिरांची अधिक संख्या लक्षात घेता पुरातत्व विभागाच्या नागपूर कार्यालयाने या मंदिरांवर लक्ष केंद्रीत केले आहे. या मंदिरांच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेण्यात आले आहे. या जीर्णोद्धाराच्या माध्यमातून प्राचीन शिवालयांना गतवैभव प्राप्त करून देण्याचा प्रयत्न पुरातत्व विभागामार्फत केला जाणार आहे.
दारव्हा तालुक्यातील महागाव कसबा येथून या जीर्णोद्धाराला प्रारंभ झाला आहे. येथे प्राचीन कमळेश्वराचे मंदिर असून विष्णू आणि शंकराची मूर्ती असलेले ते विदर्भातील एकमेव शिवालय आहे. तेथील प्रवेशद्वाराचे बांधकाम केले जात आहे. त्याकरिता नागपूर विभागाच्या मुख्य अधीक्षक (पुरातत्व) नंदिनी भट्टाचार्य-साहू यांच्या मार्गदर्शनाखालील तज्ज्ञांच्या चमूने महागाव येथे भेटही दिली आहे. या विभागाचे अभियंते जीर्णोद्धाराच्या कामावर सातत्याने लक्ष ठेऊन आहे. जिल्ह्यातील अन्य मंदिरांच्याही जीर्णोद्धाराचे काम टप्प्याटप्प्याने हाती घेतले जाणार असल्याने या मंदिरांची भग्नावस्था आता संपणार आहे.