वादळी पावसाने जिल्ह्यात प्रचंड नुकसान
By Admin | Updated: May 7, 2016 02:25 IST2016-05-07T02:25:17+5:302016-05-07T02:25:17+5:30
गुरुवारी सायंकाळी झालेल्या वादळाचा सर्वाधिक तडाखा घाटंजी आणि महागाव तालुक्याला बसला. घाटंजी तालुक्यातील कोंडजई येथे घर कोसळून महिला ठार झाली.

वादळी पावसाने जिल्ह्यात प्रचंड नुकसान
यवतमाळ : गुरुवारी सायंकाळी झालेल्या वादळाचा सर्वाधिक तडाखा घाटंजी आणि महागाव तालुक्याला बसला. घाटंजी तालुक्यातील कोंडजई येथे घर कोसळून महिला ठार झाली. तर घाटंजीत एसटी बसवर झाड कोसळल्याने पाच प्रवासी जखमी झाले. तसेच बाभूळगाव तालुक्यातील वाटखेड येथे टीनपत्र्याने महिला गंभीर जखमी झाली. वादळात चार जनावरे ठार झाली असून अनेक घरांवरील छप्पर उडून गेले आहे. शुक्रवारी महसूल प्रशासनाच्यावतीने सर्वेक्षणाला प्रारंभ करण्यात आला.
घाटंजी तालुक्यात गुरुवारी सायंकाळी झालेल्या वादळाने प्रचंड नुकसान झाले. कोंडजई येथील तुळसाबाई लक्ष्मण वाघाडे (६०) यांचे शेतातील घर वादळात कोसळली. त्या खाली दबून तुळसाबाई ठार झाल्या. हा प्रकार रात्री उशिरा उघडकीस आला. तसेच मुरली येथील हनुमंत पेंदोर यांच्या शेतातील गोठा वादळात उद्ध्वस्त झाला. त्यात एक बैल ठार झाला. तालुक्यात झालेल्या हानीची पाहणी तहसीलदार एम.एम. जोरवर करीत आहे. बाभूळगाव तालुक्यात वादळी पावसाने प्रचंड नुकसान केले. वाटखेड बु. येथील विमलताई संजय आत्राम (३७) ही महिला वादळाने उडालेला टीन डोक्याला लागल्याने गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर कोल्ही येथील पंकज खंडारकर यांची शेळी ठार झाली. बागवाडी येथील मीनाक्षी आचलिया व सुभाषचंद्र आचलिया यांची केळीची बाग जमीनदोस्त झाल्याने १० लाखांचे नुकसान झाले. सरुळ येथील गुणवंत धरणे यांची दोन एकर केळी आणि फाळेगाव येथील एका शेतकऱ्याची केळी व पपईची बाग उद्ध्वस्त झाली. दिघी येथील सुरेश सुरजुसे यांच्या घराचे छप्पर उडाले. एरंडगाव येथील सुरेश इंगोले यांच्या केळी बागेचे नुकसान झाले. राजेंद्र मधुकर हाडके यांच्या शेतातील केळीची तीन हजार झाडे मोडून पडली. खर्डा येथील मशिदीची भिंत कोसळली. यासोबतच बाभूळगाव, नांदुरा, वीरखेड, खडकसावंगा, प्रतापपूर, डेहणी, यरंडगाव, पाचखेड, घारफळ, कोल्ही, वाटखेड बु., वाटखेड खुर्द, मुस्ताबाद येथे मोठे नुकसान झाले.
यवतमाळ तालुक्यातील अकोलाबाजार परिसरात चार गावातील घरांचे अंशत: नुकसान झाले. पांढरकवडा तालुक्यातील पिंपळशेंडा व ढोकी या दोन गावातील सात ते आठ घरांची पडझड झाली. आर्णी शहरातील मायाबाई लढे, चंद्रभान कुमरे, रामदास तडसे यांच्या घरावर झाड कोसळल्याने मोठे नुकसान झाले. बोरगाव येथील सुमन सोमला राठोड या महिलेला वादळात उडालेला टीन लागल्याने ती जखमी झाली. तर कैलास राठोड याच्या पाठीवर दगड पडल्याने तोही जखमी झाला. महागाव तालुक्यातील माळकिन्ही येथे वीज कोसळल्याने दोन गाई ठार झाल्या. तर मोहदी येथील १० ते १२ घरावरील छप्पर उडाले. दिग्रस तालुक्यातील डेहणी येथील राधाकिसन अटल यांच्या मालकीची म्हैस व एक गाय वादळात ठार झाली. महसूल प्रशासनाने सर्वेक्षण सुरू केले. (लोकमत चमू)
शेकडो घरांना फटका
आर्णी तालुक्यातील शेकडो घरांंना वादळाचा फटका बसला. त्यात सावळी एक, पळशी एक, पाळोदी सहा, कुऱ्हा तळणी नऊ, बोरगाव दाभडी आठ, दाभडी सात, अंजी १६, सुकळी १४, वरुडभक्त आठ, केळझर सहा, कुऱ्हा सहा, येरमलहेटी चार, आयता आठ, जलांद्री सहा, कोसदनी चार, तळणी सहा, शिवर चार, इचोरा सहा, अंतरगाव १०, विठोली सहा, परसोडा ३९ घरांंचा समावेश आहे. तसेच येरमल हेटी येथील भारत राठोड यांच्या शेतातील डाळींबाचे मोठे नुकसान झाले. केळझरचे आर.के. चिंतावार यांचीही फळबाग उद्ध्वस्त झाली.
घाटंजी येथे एसटीवर झाड कोसळले
घाटंजी : यवतमाळवरून घाटंजीकडे येणाऱ्या एसटी बसवर वादळाने झाड कोसळल्याची घटना येथील नेहरुनगरजवळ सायंकाळी ६.१५ वाजता घडली. यामुळे बसमधील चार ते पाच प्रवासी किरकोळ जखमी झाले. चालकाच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला. गुरुवारी सायंकाळी तालुक्यात वादळी पाऊस सुरू होता. त्याच वेळी यवतमाळवरून घाटंजीकडे बस एम.एच.४०-८०७३ येत होती. नेहरुनगरजवळ रस्त्याच्या कडेला असलेले झाड कोसळत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्याने करकचून ब्रेक लावले. परंतु या झाडाची एक फांदी बसच्या समोरील भागावर आदळली. त्यामुळे बसच्या काचा फुटल्या. तसेच बसमधील प्रवासी जखमी झाले. वाहतूक नियंत्रक सुरेश भवरे व ठाणेदार एस.एस. ठाकूर यांनी घटनास्थळाला भेट दिली.