८४७ ग्रामपंचायतींना आरोग्य विभागाची नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 21:50 IST2019-06-03T21:50:43+5:302019-06-03T21:50:56+5:30
पावसाळापूर्व पाहणी अहवालात जिल्ह्यातील तब्बल ८४७ जलस्त्रोत धोकादायक असल्याची बाब पुढे आली. या अहवालाची गंभीर दखल घेत आरोग्य विभागाने ग्रामपंचायतींना नोटीस बजावून पावसाळ्यापूर्वी जलस्त्रोत सुरक्षित करण्याच्या सूचना दिल्या. अन्यथा कारवाईची ताकीद देण्यात आली.

८४७ ग्रामपंचायतींना आरोग्य विभागाची नोटीस
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पावसाळापूर्व पाहणी अहवालात जिल्ह्यातील तब्बल ८४७ जलस्त्रोत धोकादायक असल्याची बाब पुढे आली. या अहवालाची गंभीर दखल घेत आरोग्य विभागाने ग्रामपंचायतींना नोटीस बजावून पावसाळ्यापूर्वी जलस्त्रोत सुरक्षित करण्याच्या सूचना दिल्या. अन्यथा कारवाईची ताकीद देण्यात आली.
संपूर्ण जिल्ह्यात पाणी पुरवठा करणारे एकूण १२ हजार जलस्त्रोत आहे. या जलस्त्रोतांवरून गावांना पाण्याच्या पुरवठा होतो. मात्र यापैकी बहुतांश जलस्त्रोत दूषित असल्याचे आरोग्य विभागाच्या पाहणी अहवालातून स्पष्ट झाले. आरोग्य विभागाने हा अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर केला. यामध्ये झरी आणि पुसद तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींच्या जलस्त्रोतांचा समावेश आहे. ८४५ ग्रामपंचायतींच्या जलस्त्रोतांना पिवळे कार्ड देण्यात आले आहे.
पाहणी अहवालातून पुढे आलेले लाल आणि पिवळे कार्ड म्हणजे ते पाणी मानवी आरोग्यासाठी घातक असते. त्यामुळे आता पावसाळ्या पूर्वीच ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने आरोग्य विभागाने ८४७ ग्रामपंचायतींना नोटीस बजावली आहे. जे स्त्रोत उकिरडे, शौचालय आणि गटारामुळे दूषित झाले, अशा ठिकाणी स्वच्छता करून पेयजलाचे स्त्रोत सुरक्षित करण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या. मुख्याधिकारी आणि गटविकास अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने ही नोटीस ग्रामपंचायतींना पाठविण्यात आली.
या नोटीसमधील सूचनांचे पालन न झाल्यास थेट सरपंच आणि ग्रामसेवकांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. यामुळे ग्रामपंचायतींना गांभीर्याने दखल घ्यावी लागणार आहे. अन्यथा कारवाई अटळ आहे.
जिल्ह्यात ८४७ ग्रामपंचायतींचे जलस्त्रोत धोकादायक अवस्थेत आहे. जलस्त्रोत शुद्ध ठेवण्यात हयगय झाल्यास साथरोग पसरल्यास ग्रामपंचायतीला जबाबदार धरले जाईल. त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
- डॉ.किशोर कोषटवार
साथरोग नियंत्रण अधिकारी, यवतमाळ