दारव्हात ३० हजार हेक्टरवरील पीक उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 06:00 IST2019-11-03T06:00:00+5:302019-11-03T06:00:11+5:30

यावर्षी आधीच उत्पन्नात घट झाली असताना आता हाती आलेले पिकही खराब झाले. या पावसाचा फटका कापसालाही बसला. कापूस फुटला असताना अतिपावसामुळे तो वेचता आला नाही. बोंडे सडल्याने फुटलेल्या कापसाचे नुकसान झाले. त्यात शुक्रवारी रात्रभर पाऊस कोसळला. या पावसाने तर कापूस, तुरीसह इतर पिके जमीनदोस्त झाली.

Harvest of over 30,000 hectares in Darwa | दारव्हात ३० हजार हेक्टरवरील पीक उद्ध्वस्त

दारव्हात ३० हजार हेक्टरवरील पीक उद्ध्वस्त

ठळक मुद्देसंडे अँकर । शेतकरी हवालदिल, सोयाबीन, कापूस, तुरीला परतीच्या पावसाचा फटका

मुकेश इंगोले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : तालुक्याला परतीच्या पावसाने मोठा दणका दिला. यामुळे खरिपातील पिकांना मोठा फटका बसला असून ३० हजार हेक्टरवरील पीक उद्ध्वस्त झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहे.
यावर्षी ऐन सोयाबीन काढणीच्यावेळी सतत १0 दहा दिवस परतीचा पाऊस झाला. यामुळे सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले. नंतर शुक्रवारी रात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. यामुळे कापूस, तूर जमिनदोस्त झाले. या प्रमुख पिकांना फटका बसल्याने पूर्ण हंगामाच शेतकऱ्यांच्या हातून गेला. त्यामुळे तत्काळ सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची गरज आहे. यावर्षी पिकांच्या योग्य पाऊस पडल्याने शेतकरी समाधानी होते. मात्र परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना मोठा दणका दिला.
१८ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत सतत पाऊस व ढगाळी वातावरण होते. याच दरम्यान शेतकऱ्यांनी सोयाबीन सवंगणी करून गंजी लावल्या. त्या पूर्णपणे पाण्यात भिजल्या. परिणामी सोयाबीनच्या दाण्यांना कोंब फुटले. ते काळे पडले. हे सोयाबीन व्यापारी घ्यायला तयार नाही. यावर्षी आधीच उत्पन्नात घट झाली असताना आता हाती आलेले पिकही खराब झाले. या पावसाचा फटका कापसालाही बसला. कापूस फुटला असताना अतिपावसामुळे तो वेचता आला नाही. बोंडे सडल्याने फुटलेल्या कापसाचे नुकसान झाले. त्यात शुक्रवारी रात्रभर पाऊस कोसळला. या पावसाने तर कापूस, तुरीसह इतर पिके जमीनदोस्त झाली. त्यामुळे संपूर्ण हंगामच शेतकऱ्यांच्या हातून जाण्याची भीती आहे.
महसूल राज्यमंत्र्यांकडून पाहणी
नुकसानग्रस्त गावांना शनिवारी महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी भेट देवून पाहणी केली. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट प्रती हेक्टरी २५ हजार रूपयांची मदत मिळावी, याकरिता आपण शासनस्तरावर आग्रह धरणार असल्याचे ना.राठोड यांनी सांगितले. जाचक अटी लावून पीक विमा लाभ देण्यास टाळाटाळ झाल्यास विमा कंपन्यांना वठणीवर आणण्याचा इशाराही त्यांनी दिला.

दारव्हा तालुक्यात सर्व्हेक्षण प्रारंभ
परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे संयुक्त सर्वेक्षण सुरू झाले. १८ ते २८ आँक्टोबरपर्यंतच्या पावसामुळे ३६ हजार ९६ शेतकऱ्यांचे २० हजार ९१६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्रशासनाने दिला. शुक्रवारी रात्रभर २२.७७ मिलीमीटर पाऊस पडला. त्यामुळे १० हजार हेक्टरच्यावर नुकसान झाले. दरम्यान, शनिवारपासून सर्वेक्षणाला सुरूवात झाली आहे. सवेक्षणानंतरच प्रत्यक्षात किती नुकसान झाले, हे कळणार आहे.

Web Title: Harvest of over 30,000 hectares in Darwa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती