डौलदार पिकांमुळे बळीराजाच्या चेहऱ्यावर आनंदी छटा

By Admin | Updated: August 24, 2015 00:15 IST2015-08-24T00:15:31+5:302015-08-24T00:15:31+5:30

मृग नक्षत्रातच यंदा मान्सूनचा पाऊस आल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी लगबगीने पेरणी आटोपली. त्यानंतर पावसाने खंड दिल्याने ऐन उगवणीच्या काळात ...

A happy shade on the victim's face due to graceful crops | डौलदार पिकांमुळे बळीराजाच्या चेहऱ्यावर आनंदी छटा

डौलदार पिकांमुळे बळीराजाच्या चेहऱ्यावर आनंदी छटा

समाधानकारक परिस्थिती : यावर्षी तरी संकटातून तरण्याची अपेक्षा, योग्य काळजी घेण्याचे कृषी विभागाचे आवाह
दारव्हा : मृग नक्षत्रातच यंदा मान्सूनचा पाऊस आल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी लगबगीने पेरणी आटोपली. त्यानंतर पावसाने खंड दिल्याने ऐन उगवणीच्या काळात पिकांना फटका बसण्याची स्थिती निर्माण झाली होती. मात्र जुलैच्या शेवटच्या आठवड्यात समाधानकार पाऊस झाल्याने तालुक्यातील पीक परिस्थिती बऱ्यापैकी सुधारली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून सातत्याने निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकपाणी हातातून गेले. त्यामुळे या वर्षी शेतकऱ्यांना मोठ्या आशा आहेत.
मागिल वर्षाच्या तुलनेत यावर्षी तालुक्यात कपाशी लागवडीचे क्षेत्र अधिक प्रमाणात आहे. तब्बल ४१ हजार ८१४ हेक्टर क्षेत्रावर कपाशीचा पेरा आहे. त्या तुलनेत सोयाबीनचे क्षेत्र मात्र घटले आहे. सोयाबिनचा पेरा १५ हजार ७८८ हेक्टर क्षेत्रावर आहे. सुरूवातीला मृगाच्या पावसात कपाशीची लागवड जवळपास शेतकऱ्यांनी आटोपली. मध्यंतरी झालेल्या पावसाने या कपाशीला उभारी मिळाली असून आज कपाशीचे पीक डौलाने उभे आहे. या समोरही निसर्गाची साथ योग्यरित्या मिळाल्यास चांगल्या पिकांची अपेक्षा करण्यास हरकत नाही. परंतु कृषी तज्ञांच्या सल्ल्याने वेळेवर आवश्यकतेनुसार किटकनाशकांच्या फवारण्या आणि योग्य काळजी शेतकऱ्यांना घेणे गरजेचे आहे. तसे पाहता मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी फवारण्या फारशा करण्याची सध्या तरी गरज दिसत नाही. सध्या सोयाबिन व कापूस हे दोन्ही प्रमुख पीक फुलावस्थेत आहे. पिकांना फुलधारणा व फळधारणा या दोन अवस्थेत पाण्याची गरज अधिक भासत असते. काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने योग्यवेळी पिकांना संजिवनी मिळाली आहे.
सोयाबिनवर सध्या चक्रीभुंगा व पाने खाणाऱ्या अळींचा प्रादूर्भाव बघता प्रतिबंधात्मक फवारण्या सुरू आहेत. काहींनी कपाशीला उर्वरित रासायनिक खतांच्या मात्रा देणे सुरू केले आहे. ज्वारी पिकाला सध्या नत्राची गरज आहे. नत्राची योग्य मात्रा युरिया खतातून दिल्या जात असते. परंतु सध्या तालुक्यात युरियाची टंचाई आहे. या संदर्भात कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता पुढील काही दिवसातच खताची रॅक लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावर्षी दारव्हा तालुक्यात आतापर्यंत ५०१ मिमि. पावसाची नोंद झाली आहे. येत्या काळात आणखी पावसाची गरज असून निसर्गाने तशी साथ दिल्यास शेतकऱ्यांच्या पदरात दोन-तीन वर्षानंतर दोन पैसे पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. (प्रतिनिधी)

Web Title: A happy shade on the victim's face due to graceful crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.