भुईमूग दरात २०० रुपये तफावत
By Admin | Updated: May 15, 2016 01:58 IST2016-05-15T01:58:15+5:302016-05-15T01:58:15+5:30
उन्हाळी भुईमूग बाजारात येताच व्यापाऱ्यांनी नवी शक्कल लढविली आहे. भुईमुगात माती असल्याच्या नावाखाली क्विंटलमागे दीड किलोची कपात करण्यात येत आहे.

भुईमूग दरात २०० रुपये तफावत
उपनिबंधकांचे दुर्लक्ष : मातीच्या नावाखाली कट्टी, शेतकऱ्यांची लूट
यवतमाळ : उन्हाळी भुईमूग बाजारात येताच व्यापाऱ्यांनी नवी शक्कल लढविली आहे. भुईमुगात माती असल्याच्या नावाखाली क्विंटलमागे दीड किलोची कपात करण्यात येत आहे. यासोबतच भुईमुगाच्या दरात क्विंटलमागे २०० रुपयांची कपात करण्यात आली आहे. या प्रकारात शेतकऱ्यांची खुलेआम आर्थिक लूट होत असताना सहकार विभाग गप्प आहे.
वातावरणातील सततच्या बदलाने कपाशीचे खोडवा पीक शेतकऱ्यांना घेता आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापसाचे पीक काढून भुईमुगाची लागवड केली. यातून भुईमुगाची लागवड गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट झाली. जिल्ह्यात ११ हजार हेक्टरात भुईमुगाचे उन्हाळी पीक घेण्यात आले.
याच काळात भूजल पातळी घसरल्याने शेतकऱ्यांना वेळेपूर्वीच भुईमूग काढावा लागला. वन्यप्राण्यांचा मोठा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला. हातात आलेले पीक शेतकऱ्यांनी यवतमाळच्या बाजारात विक्रिसाठी नेले. व्यापाऱ्यांनी अडवणुकीचे धोरण राबवित ३० किलो मागे अर्धा किलो कट्टीनुसार भूईमुगाची खरेदी सुरू करण्यात आली. क्विंटलमागे दीड किलोची कपात केली जात आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
इतर ठिकाणच्या बाजारपेठेत भूईमुगाचे दर ५ हजार ५०० रुपये क्विंटलच्या घरात पोहोचले आहे. यवतमाळ बाजारात मात्र ५ हजार २०० रुपये एवढेच दर आहेत. यात क्विंटलमागे ३०० रुपयांची तफावत आहे.
या संपूर्ण प्रकारावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी सहकार विभागाची आहे. या विभागाचे नियंत्रण सुटल्याने शेतकऱ्यांना शेतमालात कट्टीसोबत दराच्या तफावतीचा सामना करावा लागत आहे. (शहर वार्ताहर)