शालेय पोषण आहारासाठी निकृष्ट धान्याचा पुरवठा
By Admin | Updated: July 24, 2015 02:13 IST2015-07-24T02:13:52+5:302015-07-24T02:13:52+5:30
शालेय पोषण आहार योजनेंतर्गत निकृष्ट धान्याचा पुरवठा करून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ केला जात आहे.

शालेय पोषण आहारासाठी निकृष्ट धान्याचा पुरवठा
वजनात दांडी : घाटंजी तालुक्यात मोठा गैरप्रकार
घाटंजी : शालेय पोषण आहार योजनेंतर्गत निकृष्ट धान्याचा पुरवठा करून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ केला जात आहे. शिजवलेले धान्य खरंच सकस असेल काय हा प्रश्न निर्माण झाला आहे. पोषण आहार योजनेची खानापूर्ती तेवढी सुरू आहे. या योजनेत नेमके कोणाचे खिसे गरम होत आहे हे तपासण्याची गरज पालकांमधून व्यक्त केली जात आहे. तालुक्याला प्राप्त झालेले धान्य निकृष्ट आहे. शिवाय तांदुळाच्या पोत्यांनाही गळती लागली आहे.
शालेय पोषण आहार योजनेंतर्गत शासन अनुदानाचा लाभ घेणाऱ्या शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरविला जातो. यासाठी पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी असे दोन भाग करण्यात आले आहे. तालुक्यात पहिली ते पाचवीच्या १९८ शाळा असून विद्यार्थीसंख्या ९ हजार २५५ आहे. सहावी ते आठवीच्या ७३ शाळांमध्ये ५ हजार ६८४ विद्यार्थी शिक्षण घेत आहे. यासाठी लागणाऱ्या साहित्याची मागणी शाळांकडून करण्यात आली. जून ते आॅगस्टच्या मागणीनुसार कमी-अधिक प्रमाणात धान्याचा पुरवठा करण्यात आला. प्राप्त झालेले धान्य पाहून शिक्षकही बुचकाळ्यात पडले.
तूर डाळ आणि मूग डाळ निकृष्ट आहे. शिवाय त्यात मोठ्या प्रमाणात भेसळही आहे. या डाळी शिजत नसल्याच्या तक्रारी आहे. तांदुळाच्या काही पोत्यांना ओल लागली आहे. काही पोते हातशिवणीचे, फाटलेले तर काही सूतळीने गाठी मारून आहे. ५० किलोच्या पोत्यामध्ये पाच ते दहा किलो तांदूळ कमी भरत आहे. वजनाविषयी शंका आल्याने एका केंद्र शाळेवर मोजून दिलेले तांदूळाचे पोते अंगणवाडीच्या काट्यावर मोजले. त्यावेळी पाच किलो कमी भरले. शिवाय डाळीसुद्धा कमी भरल्या. दुसऱ्या एका शाळेवर दिलेले तांदूळ ५० किलोऐवजी ४५ किलोच भरले. संबंधित शिक्षकाने ५० किलोचा आग्रह धरल्याने पुरवठा करणाऱ्यांनी धान्य परत नेले. त्यानंतर आठ-दहा दिवसांनी या शाळेला तांदूळ देण्यात आला. दरम्यानच्या काळात विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित राहिले आहे. (तालुका प्रतिनिधी)
महाराष्ट्र स्टेट कंझ्यूमर फेडरेशनचा पुरवठा संशयास्पद
हिवरी : पोषण आहारासाठी लागणारा तांदूळ शासकीय गोदामातून कंत्राटदारांमार्फत शाळांना पुरविला जातो. धान्यादी साहित्य महाराष्ट्र स्टेट कंझ्यूमर फेडरेशनमार्फत पुरविले जाते. त्यात तेल, वाटाणा, मूग डाळ, चवळी, चणा, मिरची पावडर, हळद पावडर, मीठ, मोहरीचा समावेश असतो. या साहित्यापासून तयार होणारा आहार सकस नसतो. अतिशय निकृष्ट पुरवठा केला जातो. पुरवठा करण्यापूर्वी कंत्राट देताना नमुना म्हणून धान्यादी साहित्य घेण्यात येते आणि त्याच दर्जाचा माल सर्व शाळांना पुरविणे आवश्यक आहे. मात्र निकृष्ट साहित्य पुरवून विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळ सुरू आहे. विरोधी पक्षही या विषयी बोलायला तयार नाही. त्यामुळे आता शासनानेच प्रत्येक शाळेला सॅम्पल साहित्याची किट पुरवावी, त्याच दर्जाचे साहित्य पुरवठ्याचे आदेश पुरवठादारांना द्यावे आणि गेली अनेक वर्षांपासून पुरवठा होत आलेल्या साहित्याची चौकशी करून सत्ते जनतेपुढे आणावे, असे मत व्यक्त केले जात आहे. (वार्ताहर)