ठिबक सिंचन वाढल्यास पाण्याची मोठी बचत
By Admin | Updated: February 5, 2016 01:54 IST2016-02-05T01:54:38+5:302016-02-05T01:54:38+5:30
पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरविल्यास भूजल पातळीत मोठी वाढ होईल. ठिबक सिंचनाचे प्रमाण १०० टक्क्यांवर नेल्यास पाण्याची मोठी बचत होईल.

ठिबक सिंचन वाढल्यास पाण्याची मोठी बचत
प्रल्हादराव जगताप : वि.भि. कोलते स्मृती व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प
यवतमाळ : पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरविल्यास भूजल पातळीत मोठी वाढ होईल. ठिबक सिंचनाचे प्रमाण १०० टक्क्यांवर नेल्यास पाण्याची मोठी बचत होईल. खानापूरकर पॅटर्न, बॅरेजेस हेसुद्धा मोठ्या धरणांना सक्षम पर्याय आहे. राज्य व केंद्र सरकारने अशाच पद्धतीने जलसंचय करून भूजलसाठा वाढवावा. शेतकऱ्यांना धरणाची गरज नाही, मात्र पाण्याची आहे, असे मत धरणविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रल्हादराव जगताप पाटील यांनी व्यक्त केले. येथे आयोजित डॉ. वि.भि. कोलते स्मृती व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प त्यांनी गुंफले.
प्रल्हादराव जगताप पुढे म्हणाले, ९५ गावाची हजारो हेक्टर सुपिक जमीन, एक हजार हेक्टर जैव विविधतेने समृद्ध जंगल पाण्याखाली घालून राजकारणातील काही मंडळी निम्न पैनगंगा प्रकल्पाची समर्थक बनली आहे. जीव देवू मात्र धरणासाठी जमीन देणार नाही आणि धरणही होवू देणार नाही, असा निर्धारही त्यांनी यावेळी केला. मोठी धरणे म्हणजे राजकारण्यांचे खाऊगिरीचे अड्डे झाले आहेत. निम्न पैनगंगाबाबत तर उद्घाटनापूर्वीच काम सुरू करण्याचा अफलातून प्रकार केला गेला.
विस्थापितांमध्ये पद्धतशीर फूट पाडण्याचा धरण समर्थकांचा डावही संघर्ष समितीने हाणून पाडला. आज बुडित क्षेत्रातील ९५ टक्के लोक धरण विरोधक आहे. शासनाने खंबाळा प्रकरणात शेकडो लोकांवर खटले दाखल केलेले असले तरी आमची एकजूट अभेद्य असल्याचे ते म्हणाले. अॅड. येरावार, गावंडे गुरुजी आदी सहकाऱ्यांचा त्यांनी यावेळी आवर्जून उल्लेख केला.
व्याख्यानमालेतर्फे यावर्षीपासून शेतकरी चळवळीचे प्रणेते शरद जोशी यांच्या स्मृती प्रीत्यर्थ ‘योद्धा शेतकरी’ पुरस्कार दिला जात आहे. पहिल्या वर्षी हा पुरस्कार निम्न पैनगंगा प्रकल्प विरोधी संघर्ष समितीच्या लढ्याचे १८ वर्ष नेतृत्त्व करणारे प्रल्हादराव जगताप पाटील यांना प्रदान करण्यात आला.
माजी खासदार सदाशिवराव ठाकरे, अप्पासाहेब वानखेडे, गजाभाऊ खर्चे, प्रा. रमाकांत कोलते यांच्या हस्ते स्मृती चिन्ह, शाल, श्रीफळ आणि रोख पाच हजार रुपये देवून त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांतर्फे आपण हा पुरस्कार स्वीकारत असून मिळालेली रक्कम चळवळीसाठी देत असल्याचे प्रल्हादराव जगताप यांनी यावेळी जाहीर केले. संचालन प्रा. घनश्याम दरणे यांनी, तर आभार प्रा. सीमा शेटे यांनी मानले. (वार्ताहर)