दारव्हा परिक्षेत्रातील वनसंपदेची प्रचंड हानी

By Admin | Updated: May 5, 2016 02:38 IST2016-05-05T02:38:09+5:302016-05-05T02:38:09+5:30

यवतमाळ वनवृत्तात अव्वल असणाऱ्या आणि वनसंपदेने नटलेल्या दारव्हा वन परिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार सुरू असून

Great loss of forest resources in Darwha range | दारव्हा परिक्षेत्रातील वनसंपदेची प्रचंड हानी

दारव्हा परिक्षेत्रातील वनसंपदेची प्रचंड हानी

अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : खुलेआम अवैध वृक्षतोड, गौण खनिज उत्खनन
मुकेश इंगोले  दारव्हा
यवतमाळ वनवृत्तात अव्वल असणाऱ्या आणि वनसंपदेने नटलेल्या दारव्हा वन परिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार सुरू असून त्यामुळे वनसंपदेची प्रचंड हानी होत असल्याच्या तक्रारी आहे. वेळीच या प्रकारांना पायबंद घातला गेला नाही तर वनसंपत्ती नष्ट होण्याची भीती व्यक्त केल्या जात आहे.
वनपरिक्षेत्राची जबाबदारी असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड, माती, गौण खनिजाची चोरी आणि वन्यजीवांची हत्या करण्याच्या घटना घडत आहे. मात्र त्या तुलनेत संबंधितांविरुद्ध कारवाई होत नसल्याचे बोलले जात आहे. हजारो हेक्टर क्षेत्रावर पसरलेल्या या वन परिक्षेत्रात मौल्यवान वृक्ष, बिबट, लांडगे, कोल्हे, हरीण, काळवीट, निलगाय, ससे, मोर, रोही आदी वन्यप्राणी व मोठ्या प्रमाणात लाल माती, खनिज संपत्ती, तसेच वन औषधी आहे. परंतु या मौल्यवान वस्तूंचे संरक्षण होत नसल्याने त्यावर अनेकांकडून घाला घातला जात असल्याचे प्रकार उघडकीस येत आहे.
शहरालगतचा वन परिसर तसेच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड केल्या जाते. अधूनमधून एखादी कारवाई दाखविली जाते. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात चालणाऱ्या वृक्षतोडीसाठी कारवाई नगण्य असल्यामुळे यासाठी चोरट्यांना मूकसंमती तर दिली जात नाही ना असा प्रश्न उपस्थित होतो.
त्याचबरोबर वन जमिनीवरील मातीची चोरी, अवैध गौण खनिज उत्खनन केल्या जाते. त्यामुळे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहे. हे सर्व डोळ्यासमोर असूनसुद्धा अधिकारी मात्र झोपेत आहे. यापूर्वी या भागात लागोपाठ तीन बिबट मृत्युमुखी पडले होते. तसेच मोराची शिकार होत असल्याचे उघडकीस आले होते. याचा अर्थ या वनपरिक्षेत्रात वन्यजीवांची शिकार करणारे सक्रिय असल्याचे स्पष्ट होते. परंतु या शिकाऱ्यांना पायबंद घालण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना आखलेल्या दिसत नाही. मध्यंतरीच्या काळात वन माती नाला बांध, वन्यजीव पाणी साठवण तलाव, वनतळे आदी कामांकरिता लाखो रुपयाचा निधी आला होता. परंतु यातील काही कामे नियमबाह्य करण्यात आली व कामात गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे वन्यजीवांना पिण्याकरिता पुरेसे पाणी उपलब्ध झाले नाही. सध्याच्या तीव्र तापमानात जंगलात पाणी नसल्याने वन्यप्राणी पाण्याच्या शोधात भटकत असतात. याचा शिकारी फायदा घेत असल्याचे सांगितले जाते. मात्र अधिकाऱ्यांना याचे कोणतेही सोयरसूतक नसल्यासारखे त्यांचे वागणे आहे.

वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांना बदलीचे वेध
येथील वनपरिक्षेत्र अधिकारी पी.व्ही. नाल्हे यांना सध्या बदलीचे वेध लागल्याचे वन विभागात बोलले जात आहे. त्यांच्या बदलीच्या मानसिकतेमुळे कामकाजावर परिणाम होत असल्याचे कर्मचारीवर्गात चर्चील्या जात आहे. तसेही त्यांना अनेकदा संपर्क साधला तेव्हा यवतमाळ येथील मिटींग इतर कामकाज, न्यायालयीन कामे असल्याने बाहेरगावी असल्याचे उत्तर मिळते. त्यामुळे विभागाच्या कामासाठी त्यांना कधी वेळ मिळतो हे सांगणे कठीण आहे.

Web Title: Great loss of forest resources in Darwha range

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.