‘एम्बासिंग’मध्ये अडले अनुदान

By Admin | Updated: June 20, 2015 00:20 IST2015-06-20T00:20:25+5:302015-06-20T00:20:25+5:30

‘आधी खरेदी करा, नंतर अनुदान घ्या’ या कृषी योजनेवर विश्वास ठेवलेले परिसरातील ५८८ शेतकरी अडचणीत सापडले आहे.

Granted for 'Ambassing' | ‘एम्बासिंग’मध्ये अडले अनुदान

‘एम्बासिंग’मध्ये अडले अनुदान

शेतकरी अडचणीत : वडकी परिसरात उसनवार करून खरेदी केले तुषार संच
वडकी : ‘आधी खरेदी करा, नंतर अनुदान घ्या’ या कृषी योजनेवर विश्वास ठेवलेले परिसरातील ५८८ शेतकरी अडचणीत सापडले आहे. ‘एम्बासिंग’ अर्थात विशिष्ट ओळख तुषार संचावर नसल्याने त्यांचे अनुदान अडविण्यात आले आहे. उसनवार करून खरेदी केलेल्या संचाची रक्कम मिळावी यासाठी हे शेतकरी कृषी कार्यालयाचे उंबरठे झिजवित आहे. पेरणीच्या दिवसात होत असलेली फरफट त्यांच्यासाठी अतिशय त्रासदायक ठरत आहे.
सिंचनातून समृद्धीसाठी कृषी विभागाने विविध योजना जाहीर केल्या आहे. तुषार संच योजना हीसुद्धा त्यातीलच एक भाग आहे. अल्पभूधारक शेतकऱ्याला ७५ टक्के आणि साधारण शेतकऱ्याला ५० टक्के अनुदानावर हे संच उपलब्ध करून दिले जातात. मात्र त्यासाठी कृषी विभागाने सांगितलेल्या विक्रेत्याकडून १०० टक्के रक्कम भरून संचाची उचल करावी लागते. यानंतर शेतकऱ्याच्या खात्यात अनुदानाची रक्कम साधारणत: दोन-चार महिन्यांपासून आरटीजीएस प्रक्रियेद्वारे जमा केली जाते. गतवर्षापर्यंत याच प्रक्रियेनुसार शेतकऱ्यांना अनुदान मिळत आले आहे.
अनुदानावर संच मिळत असल्याने परिसरातील एकूण ५८८ शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्याकडून तुषार संच खरेदी केले. शेतात लावून ओलितही सुरू केले. संच तपासणी अहवाल संबंधित कृषी सहायकांनी मोका तपासणी करून जिल्हा कृषी विभागाकडे पाठविला. पण, त्यात ‘एम्बासिंग’चा खोडा घालण्यात आला. अनुदानास पात्र सर्व ५८८ शेतकऱ्यांना वंचित ठेवण्यात आले. शेतात तुषार संच लावून वर्षभराचा कालावधी लोटल्यानंतर ही अडचण निर्माण करण्यात आली.
तुषार संचाचे अनुदान मिळाले असते तर ते शेतकऱ्यांना खरिपासाठी उपयोगात आले असते. आता जवळपास शेतकऱ्यांनी बी-बियाणे आणि रासायनिक खतांची खरेदी केली. यासाठी पैशांची जुळवाजुळव करताना मोठी कसरत त्यांना करावी लागली. तुषार संचासाठी घेतलेल्या रकमेची परतफेड झाली नसतानाच आता त्यांना पेरणीसाठी पैसा जुळवावा लागला. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांमध्ये कृषी विभागाविषयी कमालीचा रोष आहे. (वार्ताहर)

काय आहे ‘एम्बासिंग’?
एका संचावर दोन वेळा अनुदान दिले जावू नये किंवा घेवू नये यासाठी संचावर विशिष्ट ओळख तयार केली जाते. तुषार संच पाईपच्या जोडावर, फिमेल पोर्टवर शेतकऱ्याचे नाव, गाव, संच बसविल्याचे वर्ष लिहिले जाते. ही माहिती वितरकाकडून संच हस्तांतरित करण्यापूर्वी कोरून टाकली जाते. यानंतर त्यावर रंग दिला जातो. मजकूर सहजासहजी नष्ट होणार नाही, अशा पद्धतीने मजकूर कोरला जातो. हा मजकूर लिहिला असल्याची खात्री केल्यानंतरच अनुदान मंजूर केले जाते.
सिंचनातून समृद्धी साधण्याच्यादृष्टीने शेतकऱ्यांनी आडाचे दीड करून तुषार संचाची खरेदी केली. प्रसंगी घरातील दागदागिनेही गहाण ठेवले. शासनाचे अनुदान मिळाल्यानंतर ते सोडवून आणता येईल, या अपेक्षेने ही सर्व तडजोड करण्यात आली. परंतु प्रशासनातील दिरंगाईमुळे त्यांच्या अपेक्षेवर पाणी फेरले गेले आहे. आता अनुदान केव्हा मिळेल, दागिने केव्हा सोडवून आणणार, अशी विचारणा कुटुंबातील सदस्यांकडून होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

काही त्रुटींमुळे अनुदान देण्यास विलंब झाला. येत्या काही दिवसातच संबंधित शेतकऱ्यांना अनुदानाचे वितरण केले जाईल.
- प्रशांत नाईक,
उपविभागीय कृषी अधिकारी, यवतमाळ

Web Title: Granted for 'Ambassing'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.