ग्रामीण ठाण्याचा प्रस्ताव धूळ खात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 21:01 IST2017-08-30T21:01:05+5:302017-08-30T21:01:56+5:30
तालुक्यातील १३५ गावांतील कायदा व सुव्यवस्था सांभाळताना वणी व शिरपूर पोलिसांची दमछाक होत असताना दोन वर्षांपूर्वी वणीसाठी पाठविण्यात आलेल्या ग्रामीण पोलीस ठाण्याचा प्रस्ताव अद्यापही प्रशासनाच्या दरबारी धूळ खात पडून आहे.

ग्रामीण ठाण्याचा प्रस्ताव धूळ खात
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : तालुक्यातील १३५ गावांतील कायदा व सुव्यवस्था सांभाळताना वणी व शिरपूर पोलिसांची दमछाक होत असताना दोन वर्षांपूर्वी वणीसाठी पाठविण्यात आलेल्या ग्रामीण पोलीस ठाण्याचा प्रस्ताव अद्यापही प्रशासनाच्या दरबारी धूळ खात पडून आहे. विशेष म्हणजे वणीसह जिल्ह्यातील काही ठिकाणांसाठी पाठविण्यात आलेले प्रस्ताव मंजूर होऊन तेथे ठाणीही उघडण्यात आली. मात्र वणी तालुक्यातील नागरिकांना अद्यापही वणी ग्रामीण पोलीस ठाणे कधी होईल, याची प्रतीक्षा लागून आहे.
गेल्या ५० वर्षांत वणी तालुक्याची संख्या कितीतरी पटीने वाढली आहे. मात्र त्या तुलनेत पोलीस बळ वाढविण्यात आले नाही. वणी शहराच्या लोकसंख्येने आता ७५ हजारांचा आकडा पार केला आहे. त्यामुळे ग्रामीण भागासाठी आता स्वतंत्र पोलीस ठाण्याची गरज निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील अवैध धंदे व वाढत्या गुन्हेगारीवर पोलिसांचे सध्या नियंत्रण असले तरी पोलिसांच्या डोळ्यात धूळ झोकून छुप्या मार्गाने काही महाभाग अवैध व्यवसाय करीत आहेत.
वणी व परिसरातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर कोळसा खाणी आहेत. त्यामुळे या भागातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना डोळ्यात तेल घालून पहारा करावा लागतो. वणी तालुक्यात वणी व शिरपूर अशी दोन पोलीस ठाणी आहेत.
वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजूर कॉलरीसारखे सर्वदृष्ट्या संवेदनशिल गाव आहे. कोळसा व्यवसायामुळे ग्रामीण भागात वाहनांची संख्या बेसुमार वाढली आहे. या सर्व बाबींवर कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने नियंत्रण ठेवणे एका पोलीस ठाण्याच्या आवाक्याबाहेरचे झाले आहे. त्यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवताना पोलिसांना कसरत करावी लागते.
वणी, शिरपूर, मुकूटबन ठाण्याच्या फेररचनेकडेही दुर्लक्ष
वणी, शिरपूर, मुकूटबन ठाण्याच्या हद्दीत येणाºया गावांच्या अंतराचा विचार करताना या ठाण्याच्या क्षेत्र फेररचनेची गरज आहे. उकणी, भालर वसाहत ही गावे शिरपूर पोलीस ठाण्याला जोडण्यात आली आहेत. या गावांना शिरपूर पोलीस ठाणे २५ किलोमिटर अंतरावर पडते, तर या गावापासून वणी पोलीस ठाणे केवळ १५ किलोमिटरवर आहे. तालुक्यातील घोन्सा परिसरातील काही गावे मुकूटबन पोलीस ठाण्याला जोडण्यात आली आहे. मात्र या गावांना वणी पोलीस ठाणे जवळ पडते. पुरड गाव-शिरपूरचे अंतर ३५ कि.मी.आहे. मात्र या गावासाठी मुकुटबन पोलीस ठाणे कमी अंतराचे आहे.