ग्रामपंचायतींनी दिला वृक्ष लागवड योजनेस खो
By Admin | Updated: September 9, 2014 00:40 IST2014-09-09T00:40:31+5:302014-09-09T00:40:31+5:30
पावसाळा संपायला अवघे काही दिवसच शिल्लक आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पाऊसही चांगला झाला आहे. परंतु नेर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीत वृक्ष लागवडीला खो दिला असल्याने शासनाच्या

ग्रामपंचायतींनी दिला वृक्ष लागवड योजनेस खो
सोनखास : पावसाळा संपायला अवघे काही दिवसच शिल्लक आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पाऊसही चांगला झाला आहे. परंतु नेर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीत वृक्ष लागवडीला खो दिला असल्याने शासनाच्या अतिशय महत्वाकांक्षी शतकोटी वृक्ष लागवड योजनेचा बट्ट्याबोळ झालेला आहे. अनेक ग्रामपंचायतींनी ही योजना केवळ कागदांवरच राबविल्याचे दिसून येत आहे.
वन विभागातर्फे राबविण्यात येणारे शतकोटी वृक्ष लागवड योजनेत राज्यात कोट्यवधी वृक्षांची लागवड झाल्याचे शासन सांगत असले तरी नेर तालुक्यातील परिस्थिती मात्र काही वेगळेच दर्शविते. ग्रामपंचायतचे ग्रामसेवक व पदाधिकाऱ्यांनी आपल्या दुर्लक्षित धोरणामुळे ग्रामीण भागात ही योजना राबविलीच नसल्याचे दिसून आले आहे. नेर तालुक्यातील ग्रामपंचायतींना मोठ्या प्रमाणात शासनाकडून निधी मिळत असतानाही वृक्ष लागवडीसारख्या महत्वाच्या योजनेकडे मात्र दुर्लक्ष केल्या जात आहे.
महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतून वृक्ष लागवडीसाठी शासन दरवर्षी ग्रामपंचायतींना आवश्यक निधी देते. मात्र नेर तालुक्यात कोणत्याही ग्रामपंचायतीने वृक्ष लागवडीत विशेष कामगिरी केल्याचे दिसून येत नाही. वृक्ष लागवडीसाठी ग्रामपंचायतींमध्ये कमालीची उदासीनता दिसून येते. केवळ पैसा कमविणाऱ्या योजना व कामे वेळेवर होताना दिसतात. इतर कामांची परिस्थिती वेगळी असते. काही ग्रामसेवक तर केवळ हातलावणीचा खेळ खेळीत असून, शासनाचा फुकटचा पगार घेत आहे. मजूर कामावर गेल्यानंतर ग्रामपंचायतचे कर्मचारी जातात व १५-२० मिनिटे तिथे उभे राहून निघून येतात.
त्यामुळे ग्रामीण भागासाठी असलेल्या शासनाच्या योजनांची अंमलबजावणी होत नाही.
नेर पंचायत समितीमध्ये नुकतेच रूजू झालेल्या गटविकास अधिकाऱ्यांपुढे या ग्रामपंचायतींकडून शासनाच्या योजना योग्यरित्या व वेळेत राबवून घेण्याचे मोठे आव्हान आहे. ते हे आव्हान कसे पेलतात याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)