शासकीय निवासस्थानांची दुरवस्था

By Admin | Updated: September 10, 2014 00:01 IST2014-09-10T00:01:09+5:302014-09-10T00:01:09+5:30

शहरातील विविध विभागांच्या शासकीय निवासस्थानांची दुरवस्था झाली असून निवासस्थानांच्या दैनावस्थेस शासन आणि प्रशासनाची अनास्था कारणीभूत ठरत आहे़ निवासस्थाने उपलब्ध नसल्याने

Government residences drought | शासकीय निवासस्थानांची दुरवस्था

शासकीय निवासस्थानांची दुरवस्था

मारेगाव : शहरातील विविध विभागांच्या शासकीय निवासस्थानांची दुरवस्था झाली असून निवासस्थानांच्या दैनावस्थेस शासन आणि प्रशासनाची अनास्था कारणीभूत ठरत आहे़ निवासस्थाने उपलब्ध नसल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांना मात्र नाईलाजास्तव भाड्याच्या घरात राहावे लागत आहे.
कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहावे, असा शासनाचा आदेशच आहे. त्यामागे जनतेची कामे तत्काळ व्हावीत, असा मुख्य हेतू आहे. याच उदात्त हेतूने काही दशकांपूर्वी शासनाने विविध विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी शासकीय निवासस्थानांची निर्मिती केली. त्यात तहसील, पोलीस ठाणे, पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामीण रूग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र या विभागांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी मोक्याच्या जागी निवासस्थाने बांधण्यात आली. मात्र आता ही निवासस्थानेच वास्तव्य करण्याजोगी उरली नाहीत.
निवासस्थानांच्या बांधणीनंतर त्यांच्या देखभालीकडे संबंधित विभागाचे प्रचंड दुर्लक्ष झाले. परिणामी ही निवासस्थाने आता शेवटच्या घटका मोजत आहेत. ती अतिशय जीर्ण झाली. निवासस्थाने राहण्यायोग्य तसेच दुरूस्ती करण्याजोगीही राहिली नाहीत. त्यामुळे नाईलाजास्तव अनेक कर्मचाऱ्यांना शहरात भाड्याच्या घरात वास्तव्य करावे लागत आहे. शासकीय निवासस्थाने जीर्ण झाल्याने अनेक कर्मचारी अप-डाऊन करीत आहेत. परिणामी काही कर्मचारी नेहमी कार्यालयात उशिरा पोहोचतात. त्यामुळे जनतेची कामे खोळंबतात.
या निवासस्थानांची दुरवस्था बघून त्यांच्या दुरूस्तीची आशाही मावळली आहे. शहरात मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या या निवासस्थानांची स्थिती दयनीय झाली आहे. काही निवासस्थाने अनेक वर्षांपासून बंद असल्याने दारे, खिडक्या चोरटे लंपास करीत आहेत. छतावरील कवेलू व सागवान चोरीस जात आहे. भग्नावस्थेत असलेली ही निवासस्थाने मोकाट जनावरांचे आश्रयस्थान बनले आहे. अत्यंत दुरवस्थेत असलेल्या काही मोजक्या निवासस्थानांमध्ये काही कर्मचारी अजूनही आपले संसार कसेबसे थाटून त्यात वास्तव्य करीतच आहे.
काही निवासस्थानांच्या भींतींना आता तडे गेले. काहींची दरवाजे, खिडक्यांची तावदाने गायब झाली. कवेलू गायब झाल्याने पावसाळ्यात छतावरून पाणी गळत आहे. सोबतच निवासस्थानांभोवती घाण, सांडपाणी, केरकचरा, पिशव्या गोळा झाल्या आहेत. तरीही काही कर्मचारी त्यात आपला संसार थाटून आहेत. मात्र त्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात सरपटणारे प्राणी निघत असल्याने त्यांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. अनेकदा तर पावसाचे पाणी घरातही शिरत आहे. यामुळे त्यांचे कुटुंबीय त्रस्त झाले आहे. या निवासस्थानांच्या दुरुस्तीकडे लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा जुनी आणि जीर्ण निवासस्थाने पाडून त्या ठिकाणी नवीन निवासस्थानांची निर्मिती करण्याची आवश्यकता आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Government residences drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.