सिंचन विहिरींचे पैसे शेतकऱ्यांना तत्काळ देऊ
By Admin | Updated: August 3, 2014 00:19 IST2014-08-03T00:19:02+5:302014-08-03T00:19:02+5:30
रखडलेल्या सिंचन विहिरींचे पैसे शेतकऱ्यांना तत्काळ देऊ, तशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहे. याशिवाय विद्यार्थ्यांची परवड होऊ नये, यासाठी वसतिगृह प्रवेशाची मुदत १० आॅगस्टपर्यंत

सिंचन विहिरींचे पैसे शेतकऱ्यांना तत्काळ देऊ
पालकमंत्री : वसतिगृह प्रवेशाला मुदतवाढ
यवतमाळ : रखडलेल्या सिंचन विहिरींचे पैसे शेतकऱ्यांना तत्काळ देऊ, तशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहे. याशिवाय विद्यार्थ्यांची परवड होऊ नये, यासाठी वसतिगृह प्रवेशाची मुदत १० आॅगस्टपर्यंत वाढविण्यात आल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड. शिवाजीराव मोघे यांनी घेतलेल्या पत्रपरिषदेत सांगितले.
पालकमंत्री मोघे पुढे म्हणाले, यवतमाळ जिल्ह्यात ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडला. त्यामुळे पाणीटंचाई योजनांना ३० आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. नाफेडने शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या शेतमालाचे पैसे पाच महिन्यांपासून दिले नाही. त्यामुळे शासनाने त्यांना ५० कोटी रुपये उपलब्ध करून दिले. लवकरच नाफेड शेतकऱ्यांना शेतमालाचे पैैसे वितरित करेल.
जिल्ह्याच्या प्रश्नांवर बोलताना वणी येथे ओव्हरलोड वाहतुकीचा मोठा प्रश्न आहे. त्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांना तेथे स्वतंत्र पोलीस पथक नेमून वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. उमरखेड तालुक्यातील कोर्टा हे गाव पैनगंगा अभयारण्यात येते. त्यामुळे तेथे २८ किलोमीटर डांबरीकरण रस्ता बांधकामाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावर पर्याय शोधत तेथे खडीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. ढाणकी येथील दारू दुकानाबाबत तक्रार करण्यात आली होती. त्याची चौकशी लावली. जिल्ह्यात पाणीपुरवठ्याच्या योजना १० टक्के लोकसहभागाच्या पैशामुळे रखडल्या होत्या. आता ही अट रद्द करण्यात आल्याचेही ते म्हणाले. पत्रपरिषदेला प्रभारी जिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा नियोजन अधिकारी सिडाम, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)