काँग्रेसला खिंडित गाठण्यासाठी राष्टÑवादीचे काटे फिरताहेत वेगाने
By Admin | Updated: May 27, 2014 01:12 IST2014-05-27T01:12:57+5:302014-05-27T01:12:57+5:30
राळेगाव विधानसभेत सलग चार वेळा निवडून आलेल्या प्रा. वसंत पुरके यांना यावेळी खिंडित गाठण्याची तयारी सुरू झाली आहे. जिल्हा परिषदेत मानकरांचे प्राबल्य कमी करण्याचा

काँग्रेसला खिंडित गाठण्यासाठी राष्टÑवादीचे काटे फिरताहेत वेगाने
यवतमाळ : राळेगाव विधानसभेत सलग चार वेळा निवडून आलेल्या प्रा. वसंत पुरके यांना यावेळी खिंडित गाठण्याची तयारी सुरू झाली आहे. जिल्हा परिषदेत मानकरांचे प्राबल्य कमी करण्याचा खटाटोप पुरके यांच्याकडून करण्यात आला. हीच बाब नेमकी विरोधी लाटेसाठी कारणीभूत ठरत आहे. काहीही झाले तरी पुरकेंना ‘हात’ दाखवायचाच यासाठी ‘घड्याळा’चे काटे वेगाने फिरविले जात आहेत. काँगे्रसमधील प्रवाहाबाहेर असलेले नेतेही बाभूळगावातून ताकद देण्याच्या मानसिकतेत आहे. काहींनी राळेगाव, वडकी सर्कलमधून भावनातार्इंची ताकद वाढविण्याचे काम केले. अशीच स्थिती कळंब आणि बाभूळगाव तालुक्यातही होती. आता हे समीकरण असेच कायम ठेवून विधानसभेला परिवर्तनाची नांदी ठरविण्याच्या हालचाली आहे. दिग्रस विधानसभेत मोदी लाटेतही अपेक्षित लिड मिळवण्यात आमदार संजय राठोड अपयशी ठरले आहे. मुळात सलग दोन टर्म सत्तेत असलेली शिवसेना आता अंतर्गत धुसफुसीने पोखरली जात आहे. सहकार क्षेत्रात आलेले अपयश विरोधकांसाठी भांडवल ठरणारे आहे. या विधानसभेत काँग्रेस आणि शिवसेना दोन्ही पक्षाचे प्रत्येकी चार जिल्हा परिषद सदस्य आहे. एका जागेवर राष्ट्रवादी आहे. गेल्या दहा वर्षात जाहीर आश्वासनांपैकी ठोस असे दाखविण्यासारखे काम आजतरी शिवसेनेजवळ नाही. बंजारा समाजाच्या मतांचे धृविकरण तोडण्यासाठी पध्दतशीरपणे काँग्रेसची आखणी आहे. उमरखेडमध्ये काठावर विजयी झालेले आमदार विजय खडसे यांच्या विरोधात पहिल्याच टर्ममध्ये मोठी नाराजी आहे. या विधानसभेत काँग्रेस प्रमाणेच राष्ट्रवादी हा मोठा पक्ष आहे. आमदाराने स्थानिक राजकारणात राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्यांना कधीही साथ दिली नाही. या चार सदस्यांचे प्रभावक्षेत्र चांगले आहे. याचा फटका विधानसभेत नक्कीच बसणार आहे. याचे सुतोवाच राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी लोकसभेतील एका प्रचारसभेत जाहीररीत्या केले होते. तसेच लोकसभेत मिळालेली निसटती आघाडी ही येथील परिवर्तनाचा संकेत देणारी आहे. केळापूर-आर्णी विधानसभेत काँग्रेसच्या नेतृत्वाला स्वार्थी आणि कंत्राटदार कार्यकर्त्यांचे ग्रहण लागले आहे. त्यामुळेच पांढरकवडा, घाटंजी, आर्णी या तिनही तालुक्यात भाजपला भरघोस मते मिळाली. आतापर्यंत योग्य पर्याय नसल्याने शिवाजीराव मोघे यांचा विजय झाला. मात्र आता परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे खुद्द काँग्रेसच्या गोटातूनच बोलले जाते. बदलाच्या नावावर मोघेंच्या जागी त्यांचे पुत्र जितेंद्र मोघे यांची ‘एंट्री’ निश्चित मानली जात आहे. मात्र त्यांच्याभोवती असलेले कंत्राटदार कार्यकर्त्यांचे वर्तुळ पाहून अनेकजण दचकून आहेत. अहिरांना आर्णी-केळापूरातून मिळालेला ६० हजार मतांच्या लीडचा आकडा विधानसभेत आमच्या खात्यावर दिसेल असे जाहिर वक्तव्य मोघे गटातील जबाबदार व्यक्तींकडून केले जात आहे. ते पाहता मोघे गट लोकसभेत नेमका काँग्रेस सोबत होता की भाजपासोबत असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पुसद विधानसभा क्षेत्र नाईक घराण्याचा बालेकिल्ला म्हणून परिचित आहे. स्थानिक स्वराज्य संस्था असो की, सहकार क्षेत्र. येथे नाईकांची अभिजात सत्ता कायम राहिली आहे. मात्र लोकसभेत त्यांना काँग्रेसला अपेक्षित लिड मिळवून देता आली नाही. विशेषत: पुसद शहरात प्रस्थापित आमदाराविरोधात असलेला हा एकप्रकारचा रोष ईव्हीएम मधून दाखविण्यात आल्याचे मानले जाते. मात्र सक्षम विरोधक नसल्याने आजतरी याला वाट मिळायला मार्ग नाही. पुसदमध्ये नीलय नाईक युतीच्या गळाला लागू शकतात काय, यादृष्टीने चाचपणी केली जात आहे. तसे झाल्यास युतीला सक्षम पर्याय उपलब्ध होणार आहे. सध्या तेथे युतीने एका बॅक संचालकावर लक्ष केंद्रित केले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)