अनुभवी शेतकऱ्यांसमोर कृषी शास्त्रज्ञ हतबल

By Admin | Updated: August 7, 2015 02:23 IST2015-08-07T02:23:13+5:302015-08-07T02:23:13+5:30

सोयाबीनवर खोडकीड की येलोमोझॅक यावरून शेतकरी आणि कृषी शास्त्रज्ञ आमने-सामने उभे ठाकले होते.

In front of experienced farmers, agricultural scientist Hattbal | अनुभवी शेतकऱ्यांसमोर कृषी शास्त्रज्ञ हतबल

अनुभवी शेतकऱ्यांसमोर कृषी शास्त्रज्ञ हतबल

खोडकिडीवर शिक्कामोर्तब : अंबोडात सोयाबीनची पाहणी
संजय भगत  महागाव
सोयाबीनवर खोडकीड की येलोमोझॅक यावरून शेतकरी आणि कृषी शास्त्रज्ञ आमने-सामने उभे ठाकले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या दरबारात हा प्रश्न गेल्यानंतर त्यांनी कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांची चमू महागाव तालुक्यात पाठविली. या चमूने केलेल्या पाहणीत सोयाबीनवर खोडकिड आल्याचेच शिक्कामोर्तब झाले. अखेर अनुभवी शेतकऱ्यांसमोर कृषी शास्त्रज्ञही हतबल झाल्याचे दिसून आले.
महागाव तालुक्यातील अंबोडा परिसरातील सोयाबीनवर किडींनी आक्रमण केले होते. शेतकरी खोडकिड असल्याचे सांगत होते. तर पंजाबराव देशमुख कृषी विज्ञान केंद्राचे तज्ज्ञ येलोमोझॅक असल्याचे म्हणत होते. यावरून शेतकरी आणि कृषी शास्त्रज्ञ आमने-सामने आले. हा वाद जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंग यांच्या दरबारात पोहोचला. त्यांनी अंबोडा परिसरातील शेतीची पाहणी करण्यासाठी डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची चमू पाठविण्याचे निर्देश दिले. त्यानुसार गुरुवारी दुपारी कृषी विद्यापीठाचे पथक येथे दाखल झाले. या पथकात सहयोगी संचालक डॉ.सी.यू. पाटील, वनस्पती रोगशास्त्राचे प्रा.डॉ.योगेश इंगळे, किटक शास्त्रज्ञ डॉ.श्याम मुंजे यांच्यासह अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय गायकवाड, उपविभागीय कृषी अधिकारी कैलास वानखेडे, तालुका कृषी अधिकारी आर.डी. रणवीर यांचा समावेश होता. या पथकाने अंबोडा येथील शेतकरी अमृतराव देशमुख, मनीष जाधव, हनुमंतराव देशमुख, दादाराव ठाकरे, दिलीप घोडेकर, रवींद्र राऊत, सुरेश देशमुख यांच्या शेताची पाहणी केली. रवींद्र राऊत यांच्या शेतातील सोयाबीनवर खोडकिडीचा प्रादुर्भाव असल्याचे शास्त्रज्ञांनी मान्य केले. यामुळेच सोयाबीनचे ६० टक्के नुकसान झाल्याचेसुद्धा त्यांनी विश्रामगृहावर आयोजित बैठकीत सांगितले.
यावेळी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ शेतकऱ्यांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप हनुमंतराव देशमुख यांनी केला. विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन का केले नाही, असा सवाल त्यांनी केला. डॉ.पाटील यांनी तर दोन वर्ष शेतकऱ्यांनी सोयाबीनचे पीकच घेऊ नये, असे सूचविले. त्याशिवाय या परिसरातील सोयाबीन रोगमुक्त होणार नसल्याचा दावा केला. यावेळी कृषी विभाग आणि शास्त्रज्ञ यांच्यात एकवाक्यता दिसून येत नव्हती. त्या बाबतही शेतकऱ्यांनी शास्त्रज्ञांची फिरकी घेतली. विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांच्या ज्ञानाचा काहीच फायदा होत नसल्याचा आरोप अमृत पॅटर्नचे जनक अमृतराव देशमुख यांनी यावेळी केला. खोडकिडीचा प्रादुर्भाव तालुक्यात असून शेतकऱ्यांनी हिरव्यागार पिकाकडे पाहून समाधान मानू नये, झाडाच्या बुडापासून पिकाची तपासणी करावी, तरच त्यावरील अळीचा शोध लागेल. खोडकिडीमुळे झाड पिवळे पडले असून यावर्षीसुद्धा सोयाबीनचा फटका बसणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
कृषी विभाग पिवळा मोझॅक असल्याचे सांगत आहे. विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी आपले अज्ञात शेतकऱ्यांसमोर लपवू नये, यामुळेच शेतकरी देशोधडीला लागला, असाही आरोप उपस्थितांनी केला आहे. हा प्रकार सुरू असताना अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय गायकवाड यांनी मधला मार्ग म्हणून तालुक्यातील आणखी सोयाबीन प्लॉट पाहण्याची विनंती केली. त्यानुसार महागाव येथील बैठक अर्धवट सोडून पथक उमरखेड मार्गावरील मुडाणा, चिल्ली, सुकळी भागात पाहणी करण्यासाठी गेले.

Web Title: In front of experienced farmers, agricultural scientist Hattbal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.