लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा (यवतमाळ) : मुरमाची वाहतूक करण्याची रॉयल्टी असतानाही महसूल पथकाने ४० हजार रुपये लाचेची मागणी केली. ट्रॅक्टरमालकाने १७ हजार रोख आणून दिले. ही घटना सोमवारी घडली. त्यानंतर ट्रॅक्टरचालकाने एसीबीकडे २२ जुलै रोजी तक्रार दिली. त्यावरून एसीबीने २३ जुलै रोजी पडताळणी करून गुरुवारी सापळा लावला. बागवाडी बसस्थानकाजवळ वाघई मंदिर परिसरात खासगी व्यक्तीने लाच स्वीकारली. त्यानंतर एसीबीने लाच मागणाऱ्या चार महसूल अधिकाऱ्यांना अटक केली.
मंडळ अधिकारी जितेंद्र पांडुरंग ठाकरे (५७, रा. नातूवाडी, दारव्हा), ग्राम महसूल अधिकारी जय गणेश सोनोणे (२६, रा. पांढरकवडा), ग्राम महसूल अधिकारी पवन तानसेन भितकर (३०, रा. अंबिकानगर दारव्हा), ग्राम महसूल अधिकारी नीलेश भास्कर तलवारे (३०, इंदिरानगर, लाडखेड), खासगी इसम अशोक श्रावण रणखांब (६०, रा. हरू, ता. दारव्हा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. मंडळ अधिकारी व तीन ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांनी दारव्हा येथे मुरमाची वाहतूक करताना बंद पडलेल्या ट्रॅक्टरवर कारवाईचा धाक दाखवला. ट्रॅक्टरमालकाने पैशांची तजवीज करून १७हजार रुपये दिले.
उर्वरित पैशांसाठी तगादा सुरू होता. ट्रॅक्टरमालकाने याबाबतची तक्रार एसीबीकडे केली. यवतमाळ एसीबी पथकाने बुधवारी तक्रारीची पडताळणी करून गुरुवारी दुपारी सापळा लावला होता.