माजी नगराध्यक्षांनी वाचला नगरपरिषदेतील भ्रष्टाचाराचा पाढा
By Admin | Updated: February 3, 2016 02:40 IST2016-02-03T02:40:04+5:302016-02-03T02:40:04+5:30
यवतमाळ नगरपरिषदेमध्ये सुरु असलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चौधरी यांनी आज पत्रपरिषदेत पाढाच वाचला.

माजी नगराध्यक्षांनी वाचला नगरपरिषदेतील भ्रष्टाचाराचा पाढा
बाळासाहेब चौधरी : आजी-माजी नगराध्यक्षांच्या कार्यकाळातील प्रकरणे
यवतमाळ : यवतमाळ नगरपरिषदेमध्ये सुरु असलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चौधरी यांनी आज पत्रपरिषदेत पाढाच वाचला. नगरपरिषदेमध्ये विकास निधीचा अपहार असून खोट्या देयकांद्वारे तो करण्यात आल्याचा आरोप करत चौधरी यांनी माजी नगराध्यक्ष योगेश गढिया व विद्यमान नगराध्यक्ष सुभाष राय यांच्या कार्यकाळातील ही प्रकरणे असल्याचे सांगितले.
नगरपरिषदेतील ज्येष्ठ सदस्य बाळासाहेब चौधरी यांनी मंगळवारी पत्रकार भवनात संवाद साधला. त्यांनी यावेळी नगरपरिषदेतील चुकीची ध्येय धोरणे, रखडलेला विकास, शासकीय निधीतील अपहार, त्यात काही सदस्य व अधिकाऱ्यांचा सहभाग अशा विविध मुद्यांना हात घातला. चौधरी म्हणाले, शहराच्या विकासाला २०१० नंतर उतरती क ळा लागली आहे. पुर्वीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात केंद्र व राज्यशासनाकडून विकास निधी प्राप्त झाला आहे. मात्र हा निधी खर्च होऊनही कोणताच बदल शहरात झाला नाही. इतकेच काय तर घनकचऱ्याची आजही बिकट स्थिती आहे. कोट्यावधींचे घनकचरा सफाई कंत्राट देऊन वित्त आयोगातील सात कोटींवर रक्कम यामध्ये खर्च करण्यात आली आहे. २०१२-२०१३ या दोन वर्षातील विविध बोगस देयकांची माहिती अधिकारातंर्गत माहिती घेतली आहे. पालिकेतील पाणीपूरवठा विभाग, बाजार विभाग, आरोग्य विभाग, नियोजन विभाग आणि बांधकाम विभागात सर्वाधिक अनियमितता झाली आहे. सध्यातर गेल्या काही वर्षांपासून कोणतीही पात्रता नसलेल्या लिपिकाला पाणीपूरवठा, बाजार विभाग आणि आरोग्य विभागाचा प्रमुख बनविण्यात आले आहेत. त्याच्याकडून हा बोगस बिल काढण्याचा गोरखधंदा अव्याहतपणे सुरू आहे. या भ्रष्टाचारात काही नगरसेवकही लिप्त असून अधिकाऱ्यांनीसुध्दा आपले उखळ पांढरे करून घेतले आहे. याची तक्रार तत्कालीन जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांच्याकडे केली होती. नंतर कलम ३०८ नुसार याचिका दाखल केली. मात्र यावर कोणतीच कारवाई झाली नाही.
आता २०१५ पर्यंत काढण्यात आलेल्या सर्वच बिलांची माहिती अधिकारात माहिती मागविली आहे. त्यानंतर स्थानिक आमदार, जिल्ह्याचे पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्याकडे तक्रार करून चौकशीची मागणी करणार आहे. त्यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्यास दोन महिन्याच्या कालावधीनंतर थेट उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे बाळासाहेब चौधरी यांनी सांगितले.
पालिकेत सर्वाधिक अपहार हा शहर स्वच्छतेच्या कंत्राटातून केला जात आहे. पाणीपुरवठा विभागाने अनेक टॅँकर, विंधन विहिरी लावल्याची खोटी बिल काढली आहेत. आरोग्य विभागाकडून औषध खरेदी, सफाईच्या सुविधा, घंटागाड्या याच्या नावाखाली हजारोंच्या रकमेतील कोट्यवधीची बिले काढण्यात आली आहे. आजही हा प्रकार बिनबोभाटपणे सुरू आहे. तत्कालीन नगराध्यक्ष योगेश गढीया यांच्या कार्यकाळात सुरू झालेली ही पध्दत नगराध्यक्ष सुभाष रॉय यांच्याही काळात अव्याहतपणे सुरूच आहे. नुकताच खामगाव नगरपरिषदेतील अपहार प्रकरणात तेथील माजी नगराध्यक्षाला अटक झाली. यवतमाळ पालिकेतील भ्रष्टाचार याहीपेक्षा गंभीर आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याची सखोल चौकशी केल्यास धक्कादायक वास्तव पुढे येऊ शकते, असेही बाळासाहेब चौधरी म्हणाले. (कार्यालय प्रतिनिधी)