वनसंपदा होतेय नामशेष
By Admin | Updated: June 1, 2015 00:20 IST2015-06-01T00:20:41+5:302015-06-01T00:20:41+5:30
वणी तालुक्यातील जंगले दुर्लक्षित असल्याने त्यातील मौल्यवान वनसंपदा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

वनसंपदा होतेय नामशेष
जंगले विरळ : वन्यप्राणीही सापडले संकटात
वणी : वणी तालुक्यातील जंगले दुर्लक्षित असल्याने त्यातील मौल्यवान वनसंपदा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. सर्वच जंगले आता विरळ होऊ लागली आहे.
तालुक्यात पूर्वी मोठ्या प्रमाणात घनदाट जंगल होते. आता बहुतांश जंगले विरळ होत आहे. अवैध वृक्षतोड होत असल्याने जंगलासोबतच आता वन्यप्राण्यांवरही संकट ओढवले आहे. त्यामुळे वन्यप्राणी सैरभैर झाले आहेत. मोर, ससे, हरिण, काळवीट आदी प्राणी तर जंगलात दिसेनासे झाले आहे. शिकारीच्या प्रमाणात वाढ झाल्याने वन्यप्राण्यांवर मानवी संकट कोसळले आहे. त्यांना जंगलात जगणे कठीण झाले आहे. मानवाने स्वत:च्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी जंगलातील या विविध वन्यप्राण्यांची शिकार करण्यास सुरूवात केली आहे.
जंगलातील मुके प्राणी मानवाच्या पोटाची आग शांत करीत आहे. त्यांना जगण्यासाठी जंगलच नसल्याने त्यांची प्रजातीच आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. सोबतच पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याने वन्यप्राण्यांवर आभाळ कोसळले आहे. पुढील पिढीला या जंगलांत वन्यप्राणी होते, हे सांगूनही खरे वाटणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. ही गंभीर बाब लक्षात घेऊन शासनाने आता उपाययोजना करण्याची गरज आहे. या जंगलांच्या सुरक्षेसाठी जुन्या पर्यटन स्थळांचा विकास अथवा नवीन पर्यथटन स्थळे विकसित करण्याची गरज आहे. मात्र शासन, प्रशासन, पदाधिकारी, अधिकारी, लोकप्रतिनिधी प्रचंड उदासीन आहे. त्यामुळे आता ही बाबदेखील अशक्य वाटत आहे.
वणी तालुक्यात अनेक इतिहासकालीन ठिकाणे आहेत. या परिसरात जंगल आहे. तेथे पूर्वी नागरिक विरंगुळा म्हणून पर्यटनालाही जात होते. तेथे आपला थकवा, शिण विसरत होते. मात्र कालांतराने ही पर्यटन स्थळे दुर्लक्षित झाली. आता तेथे पर्यटन स्थळ होते, असे म्हटले तरी खरे वाटणार नाही.पुनवटनजिकच्या कवडशीच्या जंगलात तर मोठा प्राचीन ठेवा आहे. हजारो वर्षांपूर्वीच्या गुहा तेथे आहे. मात्र या जंगलात आत्तापर्यंत पर्यटन स्थळाचा विकासच केला गेला नाही. शासन, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे तेथील पर्यटनाचा विकास झालाच नाही. आता तर तेथील जंगलही नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
तालुक्यातील कायरनजीकचे जंगल, शिरपूर परिसरातील जंगल, वरझडीचे जंगल, केसुर्ली, मंदर, धनवीर, भालर, वणी, वडगाव या गावांच्या शिवेतील सुमारे एक हजार एकर परिसरातील निलगिरीचे जंगल आहे. ही सर्व जंगले आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्याकडे कुणाचेही लक्ष नाही. परिणामी ही सर्व जंगले आता अत्यंत विरळ होत आहे. पुढील काही वर्षांत ही जंगले पूर्णपणे नाहीशी होण्याची शक्यता आहे.
या सर्व बाबींकडे वन विभागाचेही दुर्लक्ष होत आहे. या जंगलांत नव्याने मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येत नाही. त्यामुळे आता ही जंगले आणि त्यातील मौल्यवान वनसंपदा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
नीलगिरी जंगलातील पर्यटनस्थळ कागदावरच
नीलगिरीच्या जंगलात १५ वर्षांपूर्वीच पर्यटन स्थळ विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तत्कालीन आमदारांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता. मात्र या जंगलातील हे पर्यटन स्थळ अद्याप बाळसेच धरू शकले नाही. दोन वर्षांपूर्वी तेथे मुलांसाठी काही गेळणी आणण्यात आली. सुरूवातीला ती वर्षभर एकाच ठिकाणी अस्तावयस्त पडून होती. आता तेथील एका बगिच्यात त्याची मांडणी करण्यात आली आहे. मात्र अद्याप या जंगलात कोणतेही कुटंंब जाण्यास धजावत नाही. कारण इतर कोणत्याही सुविधा तेथे उपलब्ध नाहीत. लोकप्रतिनिधींनी या जंगलाच्या दुर्दशेकडे लक्ष देऊन तेथे पर्यटन स्थळ विकसित करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
काजूची झाडे उरली नावापुरतीच
वणी शहरापासून घुग्गुस मार्गावर हाकेच्या अंतरावर निलगिरी जंगल आहे. या जंगलात पूर्वी काजूची एक हजार झाडे होती, असे जाणकार सांगतात. आता या जंगलात बोटावर मोजण्याइतकीच काजूची झाडे उरली आहेत. तीसुद्धा आता अत्यंत दुर्लक्षित आहे. त्यांचे संगोपन, निगा आणि जतन करण्यासाठी कुणीही पुढाकार घेत नाही. त्यामुळे पुढील काही वर्षात ही झाडेही नष्ट होण्याची शक्यता भीती व्यक्त केली जात आहे. भविष्यात निलगिरीच्या जंगलात काजूची झाडे होती, हे सांगूनही कुणाला खरे वाटणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.