वन विभागाच्या मुकुटबन विश्रामगृहावर अवकळा
By Admin | Updated: March 14, 2015 02:23 IST2015-03-14T02:23:28+5:302015-03-14T02:23:28+5:30
वन विभागाच्या येथील विश्रामगृहावर अवकळा ओढवली आहे. वन विभागाच्या दुर्लक्षामुळे त्याची प्रचंड दुरवस्था झाली असून हे विश्रामग्ह आता कधीही कोसळण्याची शक्यता बळावली आहे.

वन विभागाच्या मुकुटबन विश्रामगृहावर अवकळा
मुकुटबन : वन विभागाच्या येथील विश्रामगृहावर अवकळा ओढवली आहे. वन विभागाच्या दुर्लक्षामुळे त्याची प्रचंड दुरवस्था झाली असून हे विश्रामग्ह आता कधीही कोसळण्याची शक्यता बळावली आहे.
जवळपास २० वर्षांपूर्वी वन विभागाने येथे विश्रामगृह बांधले होते. मात्र हे विश्रामगृह बांधल्यानंतर त्याकडे या विभागाने पूर्णत: दुर्लक्ष केले. गावाच्या उत्तरेला दोन किलोमीटर अंतरावर टेकडीवर हे विश्रामगृह आहे. तेथे निसर्गरम्य वातावरणात आहे. निसर्गाच्या सानीध्यात असल्यामुळे विश्रामगृहाला सौंदर्य प्राप्त झाले आहे. तथापि त्याकडे आता कुणीच फिरकत नाही. वन विभाग देखभलाही करीत नाही. परिणामी आता त्याची पडझड सुरू झाली. भींतींना तडे गेले आहे. त्यामुळे विश्रामगृहाचे नैसर्गिक सौंदर्य बाधीत होत आहे.
या विश्रामगृहाकडे जाण्यासाठी धड रस्ता नाही. विश्रामगृहाच्या आजूबाजूला कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. परिसरात सर्वत्र केवळ काडी, कचरा, झडपे दिसून येतात. तेथे जाण्याची हिम्मतही कुणी करीत नाही. तथापि काही आचरट युवक तेथे जातात, असे आढळून आले आहे. या विश्रामगृहाच्या भींतींवर अश्लील भाषेत लिखाण करण्यात आल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे तेथे संधी साधून काही आचरट युवक जात असावे, असा संशय बळावला आहे.
या विश्रामगृहाचे जुने कवेलू फुटले आहे. दरवाजे आणि खिडक्या कधीच चोरट्यांनी लंपास केल्या आहे. परिणामी लाखो रूपये पाण्यात जात आहे. त्याचा कोणताच उपयोग होत नाही. वन विभागाने विश्रामगृहाची डागडुजी, दुरुस्ती केल्यास गावाच्या वैभवातही भर पडू शकते. ग्रामस्थांना विसाव्यासाठी हक्काचा परिसर प्राप्त होऊ शकतो.
निसर्गरम्य वातावरणात मुलांना बागडण्यासाठी हक्काचा परिसर उपलब्ध होऊ शकतो. मात्र वन विभाग अद्याप उदासीन आहे. त्यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज आहे. (शहर प्रतिनिधी)