खरिपासाठी कपाशीचे 24 लाख पॅकेट बियाणे हवे, उपलब्ध केवळ 15 लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2022 05:00 IST2022-06-02T05:00:00+5:302022-06-02T05:00:06+5:30
देशभरातील ११४ कंपन्या बियाणे विक्रीसाठी जिल्ह्यात घोडदौड करीत आहेत. कोट्यवधी रुपयांचे बियाणे विक्री करताना कंपन्यांनी गावापासून ते शहरापर्यंत जोरदार लॉबिंग सुरू केले आहे. मान्सूनपूर्व लागवड होऊ नये म्हणून कृषी विभागाने विशेष नियोजन केली होती. १ जूनपासून विक्री करण्याच्या सूचना होत्या. जिल्ह्यात चार लाख ५५ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड होण्याची शक्यता आहे. गतवर्षी कापूस लागवडीचे क्षेत्र चार लाख ३३ हजार हेक्टरवर मर्यादित राहिले होते.

खरिपासाठी कपाशीचे 24 लाख पॅकेट बियाणे हवे, उपलब्ध केवळ 15 लाख
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : यावर्षी कापसाचे दर १४ हजार रुपये क्विंटलच्या पार पोहोचले आहेत. यामुळे खरीप हंगामात विक्रमी कापूस लागवड होण्याचे संकेत आहे. १ जूनपासून कापसाचे बियाणे विक्री करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. यामुळे पहिल्याच दिवशी कृषी सेवा केंद्रांमध्ये बियाणे शोधण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. जिल्ह्यात पाच लाख हेक्टरवर कापसाची लागवड होत असल्याने बियाणे कंपन्यांनी १५ लाख पॅकेटस् बाजारात उतरविले आहे. मागणी २४ लाख पॅकेटस्ची आहे.
देशभरातील ११४ कंपन्या बियाणे विक्रीसाठी जिल्ह्यात घोडदौड करीत आहेत. कोट्यवधी रुपयांचे बियाणे विक्री करताना कंपन्यांनी गावापासून ते शहरापर्यंत जोरदार लॉबिंग सुरू केले आहे. मान्सूनपूर्व लागवड होऊ नये म्हणून कृषी विभागाने विशेष नियोजन केली होती. १ जूनपासून विक्री करण्याच्या सूचना होत्या. जिल्ह्यात चार लाख ५५ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड होण्याची शक्यता आहे. गतवर्षी कापूस लागवडीचे क्षेत्र चार लाख ३३ हजार हेक्टरवर मर्यादित राहिले होते. यावर्षी कापसाला चांगले दर मिळाल्याने कापसाचे लागवड क्षेत्र २५ हजार हेक्टरने वाढले आहे. यामध्ये पेरणी होईपर्यंत मोठे बदल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. चार लाख ५५ हजार हेक्टर क्षेत्राकरिता २४ लाख पॅकेट्स जिल्ह्यात दाखल होणार आहे. त्यापैकी विविध कंपन्यांचे १५ लाख पॅकेट्स दाखल झालेले आहे. कापसाचे क्षेत्र वाढले तर मोठा गोंधळ होण्याची शक्यता आहे.
यासाेबतच दोन लाख ८३ हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड होण्याची शक्यता आहे. यासाठी दोन लाख क्विंटल बियाणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत ७७ हजार ९१९ क्विंटल बियाणे बाजारात उपलब्ध झाले आहे. पावणेदोन लाख क्विंटल बियाणे शेतकरी घरीच तयार करीत आहे. यामुळे या बियाणांचा खर्च शेतकऱ्यांना वाचविता येणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत सोयाबीनचे क्षेत्र ३० हजार हेक्टरने घटले आहे. प्रत्यक्षात पेरणीनंतरच जिल्ह्याचे चित्र स्पष्ट होणार आहे.
यावर्षी तूर लागवडीचे क्षेत्रही सव्वा लाख हेक्टरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. त्यासाठी १६ हजार १३३ क्विंटल बियाणाची मागणी करण्यात आली आहे. त्यापैकी आठ हजार ६०० क्विंटल बियाणे बाजारपेठेत दाखल झाले आहे.
किमतीतही झाली मोठी वाढ
- सोयाबीनच्या बॅगचे दर यावर्षी ३६०० रुपयांवरून चार हजार ते ४२०० रुपयापर्यंत पोहोचले आहे. त्याच सोबतच खताच्या किमतीही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. गतवर्षी १२०० रुपयांचे असलेले पोते यावर्षी १५०० रुपयांपर्यंत बाजारात पहायला मिळत आहे. यातून शेतकऱ्यांना आर्थिक गणित मांडताना मोठ्या अडचणी येणार आहे.
बाजारपेठेत बोगस बिटीचा धुमाकूळ
- चांगल्या बियाणासोबतच छुप्या पद्धतीने बोगस बियाणे बाजारात शिरले आहे. कृषी विभाग अशा बियाणांचा शोध घेत आहे. बियाणांच्या बॅगवरील टॅग आणि इतर माहिती तपासूनच बियाणांची खरेदी करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. अधिकृत दुकानातून खरेदी केली तरच बोगस बियाणांवर कारवाई करताना शेतकऱ्यांना आधार लागणार आहे.
यामुळे बियाणांची खरेदी करताना मोठी काळजी घ्यावी लागणार आहे.