जवळा येथे पाणी पेटले
By Admin | Updated: April 30, 2016 02:42 IST2016-04-30T02:42:31+5:302016-04-30T02:42:31+5:30
आर्णी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असून आजरोजी १५ हजार लोकसंख्या असलेले हे गाव पाण्याच्या टंचाईने हैराण झाले आहे.

जवळा येथे पाणी पेटले
गावकऱ्यांचे हाल : नळयोजना बंद, हातपंप पडले कोरडे
जवळा : आर्णी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असून आजरोजी १५ हजार लोकसंख्या असलेले हे गाव पाण्याच्या टंचाईने हैराण झाले आहे. गावातील नळ योजना पूर्णपणे बंद पडली आहे. पाणीपुरवठ्याच्या दोन्ही विहिरी कोरड्या पडल्या आहेत. गावातील सर्व हातपंप कुचकामी झाले आहेत. त्यामुळे गावात पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. गुंडभर पाण्यासाठी एक-एक किलोमीटरचा प्रवास करावा लागत आहे. महिला, पुरुष तसेच लहान मुले उन्हातान्हात पाण्यासाठी वनवन भटकत आहेत.
ग्रामपंचायतसुद्धा पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र ग्रामपंचायतला अद्याप पाणीटंचाई दूर करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे यश आलेले नाही. ग्रामपंचायतीला पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ५ लाख ८० हजार रुपये निधी मंजूर झाला होता. या निधीतून ग्रामपंचायतने पाणीपुरवठ्याच्या विहिरीचे खोलीकरण केले. त्यानंतर त्याच विहिरीला आडवे बोर सुद्धा मारले. मात्र या कामाचा कोणताही फायदा झाला नाही.
आजरोजी गावातील जनता प्रशासनावर कमालीची चिडली आहे. ग्रामपंचायत कार्यालयावर महिला मंडळीचा दररोज मोर्चा येत आहे. तहसीलदार गटविकास अधिकारी, ठाणेदार यांच्यासुद्धा पाणीटंचाई निवारणासाठी बैठका होत आहे. मात्र गावाला पाणीटंचाईपासून दिलासा मिळण्याचा प्रयत्न निष्फळ ठरत आहे. देवगाव डॅम पूर्णपणे कारडा पडल्यामुळे परिसरातील छोट्या छोट्या खेड्यामध्येही पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
ग्राम स्वच्छता अभियान स्वच्छ भारत यासारख्या बाबी प्रत्यक्षात उतरविण्यासाठी शासनाने मोठ्या प्रमाणात खर्च करून ग्रामीण भागात अनुदान देवून मोठ्या प्रमाणात शौचालय बांधून दिले. टीव्ही, रेडिओच्या माध्यमातून शौचालय बांधा व वापरा, त्यासाठी त्याचे महत्त्वही जनतेला पटवून दिले. मात्र पाणीटंचाईमुळे लुप्त झालेले टमरेल घेवून लोक सकाळी शौचासाठी बाहेर पडताना दिसत आहे. नियमित शौचालयाचा वापर करणारी मंडळी आता उघड्यावर जात आहे. पिण्याच्या पाण्यासाठी जवळा येथील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. स्थानिक पुढाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
ग्रामीण भागात भंडणतंटा गावातच सोडविला जावा यासाठी शासनाने तंटामुक्त अभियान राबविले. त्यासाठी बहुतांश गावाला त्या स्वरुपाचे पुरस्कारही प्राप्त झाले. मात्र आज पाणीटंचाईमुळे पाण्यासाठी शेजाऱ्या-शेजाऱ्यामध्ये भांडणतंटा होत आहे. वेळीच पाणीटंचाईवर मात करण्यात आली नाही तर गावात भीषण परिस्थिती निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. वरिष्ठ अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)