२५० गावांमध्ये फ्लोराईडयुक्त पाणी
By Admin | Updated: May 1, 2017 00:15 IST2017-05-01T00:15:43+5:302017-05-01T00:15:43+5:30
जिल्ह्यातील १५ तालुक्यांतील २५० गावांमधील पिण्याच्या पाण्याचे ४७१ स्त्रोत फ्लोराईडयुक्त आहे.

२५० गावांमध्ये फ्लोराईडयुक्त पाणी
४७१ स्त्रोत्र :दूषित पाण्याची समस्या कायमच, २२५ ग्रामपंचायतीअंतर्गतची गावे, आरओ मंजूर, पण बसलेच नाही
यवतमाळ : जिल्ह्यातील १५ तालुक्यांतील २५० गावांमधील पिण्याच्या पाण्याचे ४७१ स्त्रोत फ्लोराईडयुक्त आहे. या गावांमधील नागरिकांना तेच पाणी प्राशन करावे लागत असल्याने त्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्ह्यात दोन हजारांवर गावे आहे. तब्बल बाराशे ग्रामपंचायती व गटग्रामपंचायती आहे. या अंतर्गत ही सर्व २५० गावे येतात. विविध गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी उपाययोजना केल्या गेल्या आहे. त्यात कुठे नळयोजना, हातपंप, सौरपंप, तर कुठे सार्वजनिक विहिरींव्दारे पाणी पुरवठा केला जातो. मात्र यातील तब्बल २५० गावांमधील पिण्याच्या पाण्याचे ४७१ स्त्रोत्र फ्लोराईडयुक्त असल्याचे एका पाहणीत आढळून आले. तेथील ग्रामस्थ तेच पाणी प्राशन करीत असल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
जिल्ह्यातील २५० गावांमधील पाण्याचे ४७१ स्त्रोत्र फ्लोराईडयुक्त असून त्यात १३५ नळयोजना आहेत. या नळांना फ्लोराईडयुक्त पाणी येत आहे. उर्वरित स्त्रोत्रांमध्ये हातपंपाच्या पाण्याचा समावेश आहे. याशिवाय काही विहिरींचासुद्धा समावेश आहे. विशेष म्हणजे अशा परिसरात ५७ टक्के हातपंपांचे पाणी फ्लोराईडयुक्त असल्याचे पाहणीत आढळून आल्याने तेथील ग्रामस्थांच्या आरोग्याची समस्या उभी ठाकली आहे.
या पाहणीत दिग्रस तालुक्यातील एकही स्त्रोत्र फ्लोराईडयुक्त नसल्याचे आढळून आले. मात्र याच तालुक्यातील काही गावांत किडणी आजाराचे रूग्ण आहे. (शहर प्रतिनिधी)