राष्ट्रसंत अडाणचा पूर पोहून आले होते बोरगावात

By Admin | Updated: April 30, 2016 02:36 IST2016-04-30T02:36:23+5:302016-04-30T02:36:23+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आर्णी तालुक्यात अनेक गावात आले होते. यात जवळा, शेलू (शें), कुऱ्हा, बोरगाव, चिखली,

The floods of national antaracha flooded in Borgaon | राष्ट्रसंत अडाणचा पूर पोहून आले होते बोरगावात

राष्ट्रसंत अडाणचा पूर पोहून आले होते बोरगावात

तुकडोजी महाराज जयंती : १९५४ ची चातुर्मास समाप्ती ठरली संस्मरणीय
हरिओम बघेल आर्णी
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आर्णी तालुक्यात अनेक गावात आले होते. यात जवळा, शेलू (शें), कुऱ्हा, बोरगाव, चिखली, कवठाबाजार, आर्णी, तळणी, लोणी, पहूर यांचा समावेश आहे. त्यातील बोरगाव (पुंजी) येथील आठवण तर संस्मरणीय ठरली. कारण या गावातील चातुर्मास समाप्तीसाठी राष्ट्रसंत चक्क अडाण नदीचा पूर पोहून आले होते. राष्ट्रसंतांच्या जयंतीनिमित्त त्या आठवणींना हा उजाळा...
२९ व ३० सप्टेंबर १९५४ ची ही घटना आहे. ३० सप्टेंबरच्या दिवशी बोरगावमध्ये चातुर्मास समाप्तीसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज उपस्थित राहणार होते. चांदापूर आश्रम ता.घाटंजी व बोरगाव यातील अंतर तीन किलोमीटर आहे. महाराज २८ सप्टेंबरला चांदापूरला आले होते. तेथील गावकऱ्यांनी महाराजांना आणण्यासाठी खास ज्ञानोबाजी भगवंतराव डेहणकर व महादा मडावी यांना रवाना केले होते. घाटंजी येथे दादासाहेब ढगले यांच्याकडे महाराज मुक्कामी होते. त्यानंतर घाटंजी ते चांदापूर हे १५ किलोमीटर अंतर पायी तुडवत आले. पांढुर्णा, मोठा पांढुर्णा या मार्गाने येऊन कुऱ्हाड गावात महाराज थोडावेळ थांबले. कुऱ्हाड व चांदापूर दरम्यान अडाण नदी आहे. अडाण नदीला पूर आलेला होता. नदीच्या पलिकडे चांदापूर, डोंगरगाव, बोरगाव येथील मंडळी महाराजांची वाट पाहात काठावर थांबली होती. त्यावेळी सायंकाळचे ५.३० वाजले होते. अचानक महाराजांनी नदीपलिकडे पोहत जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी स्वत:चा सदरा डोक्याला बांधून धोतराची लंगोट तयार केली आणि पोहायला सज्ज झाले.
यावेळी महाराजांसोबत पुरी व बाबाराव यादव हे तबला-पेटीवादक तसेच महादा मडावी व ज्ञानोबाजी डेहणकरही होते. त्यांनीही महाराजांसोबत पोहण्याचा निर्णय घेतला. महाराजांपाठोपाठ त्यांनीही पुरात उडी घेतली. महाराज सरळ रेषेत पोहत काठावर पोहोचले. परंतु सहकारी आले नाही म्हणून काठावरील नागरिकांच्या मनात शंका आली. काही वेळानंतर सहकारीही काठावर पोहोचल्यानंतर साऱ्यांचा जीव भांड्यात पडला. ही बातमी चांदापुरात पोहोचल्यावरही सगळ्यांनी आनंद साजरा केला. दुसऱ्या दिवशी ३० सप्टेंबर १९५४ ला महाराज चांदापूरवरून बोरगावला आले व नियोजित कार्यक्रम पार पडला. संकटाच्या वेळीही न घाबरता आपल्या ध्येयाकडे वाटचाल केली पाहिजे, अशी शिकवणच राष्ट्रसंतांनी प्रत्यक्ष कृतीतून दिली.

Web Title: The floods of national antaracha flooded in Borgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.