मुदत तोंडावर, अन् विम्याचे सर्व्हरच ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 21:58 IST2018-07-20T21:58:05+5:302018-07-20T21:58:26+5:30
पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचे हेलपाटे सुरूच आहेत. त्यातच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना विम्याचा आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी २४ जुलै ही अंतिम मुदत असताना संकेतस्थळच धिम्या गतीने चालत आहे. शुक्रवारी तर या संकेतस्थळाचे दिल्ली येथील सर्व्हरच बंद पडल्याने यवतमाळसह राज्यभरातील शेतकऱ्यांचे वांदे झाले आहेत.

मुदत तोंडावर, अन् विम्याचे सर्व्हरच ठप्प
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचे हेलपाटे सुरूच आहेत. त्यातच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना विम्याचा आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी २४ जुलै ही अंतिम मुदत असताना संकेतस्थळच धिम्या गतीने चालत आहे. शुक्रवारी तर या संकेतस्थळाचे दिल्ली येथील सर्व्हरच बंद पडल्याने यवतमाळसह राज्यभरातील शेतकऱ्यांचे वांदे झाले आहेत.
कर्जदार शेतकऱ्यांचा पीकविमा बँका उतरविणार आहेत. यामुळे अशा १ लाख १४ हजार ८०० शेतकऱ्यांना विमा उतरविण्यासाठी बँकांच्या चकरा मारण्याची गरज नाही. बिगर कर्जदार शेतकऱ्यांना मात्र सीएससी केंद्रावर आॅनलाईन अर्ज दाखल करावा लागणार आहे.
याकरिता जिल्ह्यात ३०० अधिकृत केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. या केंद्रांवर शेतकऱ्यांना विनाशुल्क अर्ज भरण्याची सोय आहे. केवळ पिकांच्या प्रिमीयमचीच रक्कम येथे शेतकऱ्यांना भरावी लागणार आहे. पीकविमा अर्ज भरण्यासाठी सीएससी केंद्राने पैसे घेतल्यास अशा केंद्राची मान्यता रद्द करण्यात येणार आहे. तक्रार आल्यास शहानिशा करून कारवाई केली जाईल, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांनी ‘लोकमत’ला दिली.
कर्मचाऱ्यांशी भांडणे
सातबाराचे संकेतस्थळ बंद असल्याने सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांना पीक विमा काढणे कठीण होऊन बसले आहे. त्यात शुक्रवारी पीकविमा संकेतस्थळाचे सर्व्हरच ठप्प पडल्याने शेतकऱ्यांची पंचाईत झाली. अर्ज भरण्यासाठी गेलेल्या शेतकºयांना कर्मचाऱ्यांशी भांडण करण्याची वेळ आली. २४ जुलैची मुदत जवळ आली असून शेतकरी धास्तावले आहेत.