पहिल्या निवडणुकीत जिल्ह्यात काँग्रेसची सरशी
By Admin | Updated: September 6, 2014 02:25 IST2014-09-06T02:25:40+5:302014-09-06T02:25:40+5:30
महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर विधानसभेची पहिली निवडणूक १९६२ साली पार पडली. या निवडणुकीत यवतमाळ जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघापैकी...

पहिल्या निवडणुकीत जिल्ह्यात काँग्रेसची सरशी
यवतमाळ : महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर विधानसभेची पहिली निवडणूक १९६२ साली पार पडली. या निवडणुकीत यवतमाळ जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघापैकी चार ठिकाणी काँग्रेसने तर एका ठिकाणी अपक्षाने विजय संपादित केला होता. या निवडणुकीत पुसदमधून वसंतराव नाईक, उमरखेडमधून रामचंद्र शिंगणकर, दिग्रसमधून माधवराव महिंद्रे, दारव्हा येथून अली हसन जीवाभाई ममदानी हे काँग्रेसच्या तिकिटावर तर यवतमाळ विधानसभा मतदारसंघातून जांबुवंतराव धोटे अपक्ष विजयी झाले होते.
यवतमाळ जिल्ह्यात झालेली ही निवडणूक अतिशय रंगतदार झाली होती. यवतमाळ विधानसभा मतदारसंघात सहा उमेदवार उभे होते. काँग्रेसच्या तिकीटावर छबूताई डहाके, जनसंघाकडून नारायण रानडे आणि अपक्ष म्हणून जांबुवंतराव धोटे, बाबूराव येरावार, रामनारायण चमेडिया आणि उद्धवराव वाघमारे रिंगणात होते. या निवडणुकीत अपक्ष जांबुवंतराव धोटे यांनी १९ हजार १३७ मते घेत काँग्रेसच्या छबूताई डहाके यांचा पराभव केला होता. दारव्हा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे अलीहसन जीवाभाई ममदानी २७ हजार ५८२ मते घेऊन विजयी झाले. त्यांनी हनुमंतगिर महादेवगिर (अपक्ष), हिरामन सोनडवले (रिपाइं) आणि महादेव भोवते यांचा पराभव केला. दिग्रस विधानसभा मतदारसंघात केवळ चार उमेदवार रिंगणात होते. काँग्रेसचे माधवराव महिंद्रे यांनी शेकापचे गोविंदराव पुंजाजी बुचके यांचा पराभव केला. या निवडणुकीत जनसंघाचे नामदेवराव चव्हाण आणि अपक्ष झियाउद्दीन इसाक सईद रिंगणात होते.
नाईक घराण्याचा परंपरागत गड असलेल्या पुसद विधानसभा मतदारसंघात १९६२ च्या निवडणुकीत वसंतराव नाईक काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाले. पुढे ते मुख्यमंत्री पदीही विराजमान झाले. वसंतराव नाईकांनी नलिनीबाई मुखरे (अपक्ष), बाबाराव लोखंडे (रिपाइं), किसन पाईकराव (अपक्ष) यांचा पराभव केला. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या निर्मितीपासून आजतागायत या मतदारसंघावर नाईक घराण्याचेच वर्चस्व आहे.
उमरखेड हा १९६२ साली अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघ होता. या मतदारसंघात रामचंद्र नामदेवराव शिंगणकर हे काँग्रेसच्या तिकिटीवर विजयी झाले. त्यांनी विश्वासराव कांबळे (अपक्ष) आणि साहेबराव शिरसाट (रिपाइं) यांचा पराभव केला. महाराष्ट्र स्थापनेनंतर पहिल्याच निवडणुकीत यवतमाळ जिल्ह्यातील मतदारांनी काँग्रेसच्या बाजूने कौल दिला. काही निवडणुकांचा अपवाद वगळता हा जिल्हा सदैव काँग्रेसच्याच पाठीशी दिसत आहे. ( नगर प्रतिनिधी)