फायनान्स कंपनीकडून शेतकऱ्याला मारहाण
By Admin | Updated: October 22, 2015 04:10 IST2015-10-22T04:10:03+5:302015-10-22T04:10:03+5:30
कर्ज थकीत झाल्यामुळे शहरातील एका फायनान्स कंपनीने मारहाण करून डांबून ठेवल्याची माहिती घाटंजी

फायनान्स कंपनीकडून शेतकऱ्याला मारहाण
यवतमाळ : कर्ज थकीत झाल्यामुळे शहरातील एका फायनान्स कंपनीने मारहाण करून डांबून ठेवल्याची माहिती घाटंजी तालुक्यातील करमना येथील राजेश भाऊराव बुरेवार (४५) या शेतकऱ्याने बुधवारी पत्रपरिषदेत दिली.
येथील एलआयसी चौकातील बाजोरिया कॉम्लेक्समध्ये कार्यालय असलेल्या महेंद्र फायनान्स कंपनीकडून राजेश बुरेवार यांनी कर्ज घेतले होते. त्यापैकी काही हप्ते आपण भरले परंतु पावसाने पाठ फिरविल्यामुळे नापिकी झाल्याने काही हप्ते थकित झाल्याचे त्यांनी सांगितले. आपण याबाबत सबंधित फायनान्सच्या कार्यालयात मुदत मागविण्यासाठी गेलो असता तिथे असलेल्या पाच लोकांनी शटर बंद करून तीन कोऱ्या स्टँपवर व तीन कोऱ्या कागदांवर सह्या व अंगठ्या देण्यास सांगितले. या बाबीला आपण विरोध केल्यानंतर आपल्याला तिथे उपस्थित पाच लोकांनी बेदम मारहाण केल्याचे त्यांनी सांगितले. पाच ते सहा तास डांबून ठेवले, मोबाईलचे नुकसान केले व खिशातील पाच हजार रुपये आणि एमएच२९ एस२८६६ ही दुचाकी हिसकावून घेतल्याचा आरोपही पत्रपरिषदेत राजेश बुरेवार यांनी केला.
या प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई व्हावी आणि आपल्याला न्याय मिळावा, अशी मागणी राजेश बुरेवार यांनी केली आहे.
या प्रकरणी पोलिसांकडूनही योग्य ती कारवाई होत नसलयचा आरोपही त्यांनी केला. सबंधित फायनांन्स कंपनीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कंपनीकडून कुणीही उपलब्ध होऊ शकले नाही. (प्रतिनिधी)