बंदीमुक्ती योजनेंतर्गत पालकमंत्र्यांच्याहस्ते अर्थसहाय्य
By Admin | Updated: March 30, 2015 02:00 IST2015-03-30T02:00:55+5:302015-03-30T02:00:55+5:30
जिल्हा मध्यवर्ती कारागृहात महिला व बालविकास विभागाच्यावतीने कारागृहातून मुक्त झालेल्या बंद्यांना त्यांच्या पुनर्वसनासाठी अर्थसहाय्यचे वितरण...

बंदीमुक्ती योजनेंतर्गत पालकमंत्र्यांच्याहस्ते अर्थसहाय्य
यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती कारागृहात महिला व बालविकास विभागाच्यावतीने कारागृहातून मुक्त झालेल्या बंद्यांना त्यांच्या पुनर्वसनासाठी अर्थसहाय्यचे वितरण पालकमंत्र्यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी कारागृहाचे अधीक्षक श्रीकृष्ण भुसारी, परमानंद अग्रवाल, तुरुंग अधिकारी भांबरे, शोभा बाविस्कर, विनीत ठाकरे उपस्थित होते.
कळत न कळत अनेकांकडून गुन्हा घडत असतो. अशा गुन्ह्यात काहींना बंदी व्हावे लागते. परंतु हे बंदीही शेवटी माणूसच असतो. बंदी मुक्त झाल्यानंतर अशा व्यक्तींना समाजाकडून वाईट वागणूक मिळण्याची शक्यता असते. या व्यक्तींकडे वेगळया नरजेतून न पाहता स्वयंरोजगारांच्या माध्यमातून त्यांचे पुनर्वसन करणे आवश्यक आहे व त्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.
कारागृहातून मुक्त झालेले वसंत नारायण मिलमिले, दिपक नारायण ससाने, चंद्रशेखर नारायण मुंदे, सलीम शाह मज्जीद शाह, सुरेश विठ्ठलराव एकोणकार यांना प्रत्येकी पाच हजार रूपयाच्या अर्थसहाय्यचे वितरण करण्यात आले. शासनाच्यावतीने बंदीबांधवांच्या पुनर्वसनासाठी देण्यात येत असलेली पाच हजाराची रक्कम कमी असून ही रक्कम वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे श्री.राठोड म्हणाले. तुरुंगातून मुक्त झाल्यानंतर बंदीबांधवांना पुनर्वसनासाठी ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे, ते शासन व स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी अभ्यास करणार असल्याचेही पालकमंत्री म्हणाले.
एखादी व्यक्ती कारागृहात असतांना त्यांचे कुटुंब अडचणी असते. अशा कुटुंबांना मदत देण्यासंदर्भातही विचार केला जाणार आहे. कारागृहात बंदी मुक्त वातावरणात राहिल्या पाहिजे. त्यासाठी आवश्यक सुविधा उभारण्यावर भर राहणार असून कारागृह प्रशासनाने त्याबाबतीत अवगत करावे. बंद्यांना अडचणी असल्यास त्यांनी हक्काने सांगाव्यात. त्याची दखल घेतली जाईल, असेही पालकमंत्री म्हणाले.
प्रास्ताविक कारागृह अधीक्षक श्रीकृष्ण भुसारी यांनी तर संचलन धनंजय नंदपटेल यांनी केले. यावेळी पालकमंत्र्यांनी कारागृहातील स्वयंपाकगृहास भेट देऊन तेथील भोजन व्यवस्थेची पाहणी केली. तसेच बंदी वास्तव्यास असलेल्या बॅरेक्स व तेथील सुविधांची माहिती घेतली. (कार्यालय प्रतिनिधी)