दोन चिमुकल्यांसह मातेची तासभर मृत्यूशी झुंज
By Admin | Updated: June 20, 2015 00:12 IST2015-06-20T00:12:07+5:302015-06-20T00:12:07+5:30
पावसामुळे कोसळलेल्या घराच्या मलब्यात दोन चिमुकल्यांसह माता दबल्या गेली.

दोन चिमुकल्यांसह मातेची तासभर मृत्यूशी झुंज
उमरखेडची घटना : पावसाने कोसळलेल्या घरात दबलेल्यांना नागरिकांनी सुखरुप काढले
उमरखेड : पावसामुळे कोसळलेल्या घराच्या मलब्यात दोन चिमुकल्यांसह माता दबल्या गेली. नागरिकांच्या हा प्रकार लक्षात येताच तासभराच्या प्रयत्नानंतर तिघींनाही बाहेर काढले. ही घटना उमरखेड येथील इंदिरानगरात गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडली. यात जखमी झालेल्या तिघींवर नांदेडच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे.
शहरातील महागाव मार्गावरील इंदिरानगरमध्ये बाबूशा काळबांडे यांचे घर आहे. गुरुवारी सायंकाळी आलेल्या वादळी पावसात त्यांचे घर जमीनदोस्त झाले. यावेळी घरात असलेली त्यांची पत्नी वर्षा बाबूशा काळबांडे, मुलगी अनुसरा आणि विद्या या तिघी मायलेकी घराच्या मलब्याखाली दबल्या. त्याच वेळी त्यांची आई कौशल्या काळबांडे सुदैवाने बाहेर होत्या. त्यांनी आरडाओरडा करीत नागरिकांना मदतीसाठी बोलाविले. विलास चव्हाण, सतीश कोल्हे, शेख निसार यांनी नागरिकांच्या मदतीने अख्खा ढिगारा उपसून या तिघींनाही बाहेर काढले. यावेळी मदत मिळाली नसती तर मोठा अनुचित प्रकार घडला असता. या तिघींनाही जखमी अवस्थेत उमरखेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. जबर मार असल्याने नांदेड येथे उपचारासाठी रवाना करण्यात आले.
कोसळलेल्या घरात आपल्या दोन चिमुकल्यांसह मातेने तासभर निकराची झुंज दिली. नागरिकांनी या तिघींना सुखरुप बाहेर काढले. तेव्हा सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार सचिन शेजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी प्रकाश माने यांनी घराचा पंचनामा केला. सध्या बेघर झालेल्या काळबांंडे परिवाराला शासनाच्या मदतीची आशा आहे. (शहर प्रतिनिधी)