विधानसभा स्वबळावर लढवा
By Admin | Updated: June 16, 2014 23:42 IST2014-06-16T23:42:51+5:302014-06-16T23:42:51+5:30
आगामी विधानसभा निवडणुका आघाडीत नव्हे तर स्वतंत्रपणे लढल्या जाव्या, या माध्यमातून आपली पक्षाची ताकद तपासता येईल, असा एकमुखी सूर काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमधून ऐकायला मिळत आहे.

विधानसभा स्वबळावर लढवा
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा एकमुखी सूर :
यवतमाळ : आगामी विधानसभा निवडणुका आघाडीत नव्हे तर स्वतंत्रपणे लढल्या जाव्या, या माध्यमातून आपली पक्षाची ताकद तपासता येईल, असा एकमुखी सूर काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमधून ऐकायला मिळत आहे.
जिल्हा काँग्रेस कमिटीच्या रविवारी झालेल्या बैठकीत हा सूर ऐकायला मिळाला. तर १८ जून रोजी होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यातसुद्धा हाच सूर अधिकृतपणे ऐकायला मिळणार आहे. या दृष्टीने अनेक कार्यकर्त्यांनी बैठक गाजविण्याची तयारीही केली आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. सरकार आघाडीचे असले तरी दोनही पक्षाच्या नेते-कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड लाथाड्या आहेत. जिल्हा, तालुका आणि गाव स्तरावर तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमधून विस्तवही जात नाही, अशी स्थिती आहे. काँग्रेसचा उमेदवार असेल तर राष्ट्रवादीवर विरोधात काम केल्याचा आरोप होतो आणि राष्ट्रवादीचा उमेदवार असेल तेथे काँग्रेसवर आगपाखड केली जाते. दोनही पक्ष एकमेकांसाठी प्रामाणिकपणे काम करीत नसल्याचे, विरोधकांना ताकद देत असल्याची ओरड नेहमीच ऐकायला मिळते. यवतमाळ जिल्ह्यात तर काँग्रेसला जागा दाखविण्यासाठी राष्ट्रवादीने जिल्हा परिषदेत चक्क शिवसेनेसोबत घरठाव केला. तेव्हापासून काँग्रेस-राष्ट्रवादीतील संंबंध आणखी ताणले गेले आहेत. लोकसभा निवडणुकीत सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे यांच्या पराभवासाठी काँग्रेसमधील गटबाजीसोबतच राष्ट्रवादीवरही ठपका ठेवण्यात आला. या दोनही पक्षातील अविश्वासाचे हे वातावरण पाहता विधानसभेच्या आगामी निवडणुका स्वतंत्रपणे लढविल्या जाव्या, असा सर्वसमावेशक सूर काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमधून ऐकायला मिळत आहे.
निवडणुका हरलो तरी चालेल, स्वबळावर मिळतील तेवढ्याच जागा कामाच्या, या माध्यमातून पक्षाला आपली ताकद कळेल, असा दोनही पक्षांतील कार्यकर्त्यांचा मतप्रवाह आहे. कार्यकर्त्यांची ही भूमिका पाहून अनेक नेत्यांनीही त्या दृष्टीने गांभीर्याने विचार चालविला आहे. गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांचे शिष्टमंडळ शरद पवारांना मुंबईत भेटले. त्यावेळीसुद्धा स्वबळावर निवडणुका लढण्याचा मुद्दा रेटला गेला. काँग्रेस-राष्ट्रवादी स्वतंत्र लढल्यास जातीयवादी पक्षांची सरशी होण्याची भीती नेहमीच बाळगली जाते. मात्र एकदा ही भीती झुगारुन स्वबळावर विधानसभा लढव्याव्या, अशी पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांची मागणी आहे.
यवतमाळ जिल्ह्यात विधानसभेचे सात मतदारसंघ आहेत. सध्या त्यातील केवळ पुसद हा एकच मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला आहे. मनोहरराव नाईकांच्या रुपाने कॅबिनेट मंत्री पद राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे.
(जिल्हा प्रतिनिधी)