खरडगाव येथे ग्रामस्थांचे उपोषण
By Admin | Updated: June 8, 2017 01:18 IST2017-06-08T01:18:10+5:302017-06-08T01:18:10+5:30
स्वमालकीच्या जागेचे दस्तऐवज दुरुस्त करून देण्याच्या मागणीसाठी खरडगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर १२ नागरिकांनी सुरू केलेल्या

खरडगाव येथे ग्रामस्थांचे उपोषण
दुसरा दिवस उजाडला : जागेचे दस्तऐवज दुरुस्तीची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : स्वमालकीच्या जागेचे दस्तऐवज दुरुस्त करून देण्याच्या मागणीसाठी खरडगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर १२ नागरिकांनी सुरू केलेल्या उपोषणाचा बुधवारी दुसरा दिवस उजाडला आहे. सदर प्रश्न सोडविण्यासाठी सादर केलेल्या निवेदनाद्वारे उपोषणाचा इशारा देऊनही संबंधित प्रशासनाने कुठलीही कारवाई केली नाही. अखेर अन्यायग्रस्तांना उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला.
सन २०१४-१५ मध्ये लागून लागून असलेली ६० पैकी १८ घरे भोगवटदार दाखविण्यात आली. नमूना ८ वर तत्कालीन ग्रामसेवकाने तशी नोंदही घेतली. दोन ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र ठरविण्यासाठी ही उठाठेव करण्यात आली. त्यांची घरे अतिक्रमणात आहे, हे दाखविण्यासाठी हा प्रकार करण्यात आला. या दोघांसह १८ जणांना स्वमालकीची जागा असूनही अतिक्रमणात दाखविले गेले.
ही गंभीर बाब या अन्यायग्रस्त नागरिकांनी प्रशासनाच्या निदर्शनास वारंवार आणून दिली. न्याय मिळत नसल्याने अमरावती आयुक्तालयात धाव घेण्यात आली. दस्तऐवजात फेरफार केल्याची बाब स्पष्ट झाल्याने तत्कालीन ग्रामसेवकावर निलंबणाची कारवाई करण्यात आली. त्याचवेळी दस्तऐवजात दुरुस्ती करण्याचा आदेशही देण्यात आला. परंतु रेकॉर्डमध्ये दुरुस्ती करण्यात आली नाही. परिणामी स्वमालकीची जागा असूनही घरकुलाच्या लाभापासून त्यांना वंचित राहावे लागत आहे.
सदर प्रकरणात दोषींवर कारवाई व्हावी, दस्तऐवजात दुरुस्ती करावी या मागणीसाठी गोरखनाथ सराटे, सुनील वानखडे, रवींद्र वानखडे, फुलनबाई रंगारी, बेबीताई सवईकर, रमाबाई नंदेश्वर, रामचंद्र सवईकर, दादाराव राखडे, नंदू गायकवाड, दिगांबर गिरुळकर, रमेश वानखडे, युवराज गुल्हाने यांनी उपोषण सुरू केले आहे.