खते आणि बियाण्यांचे लिंकिंग

By Admin | Updated: June 28, 2015 00:10 IST2015-06-28T00:10:08+5:302015-06-28T00:10:08+5:30

गत आठ दिवसात तालुक्यात झालेल्या दमदार पावसाने शेतकऱ्यांची पेरणीची लगबग वाढली आहे.

Fertilizers and seeds linking | खते आणि बियाण्यांचे लिंकिंग

खते आणि बियाण्यांचे लिंकिंग

शेतकऱ्यांची पिळवणूक : तालुका कृषी अधिकाऱ्याचे दुर्लक्ष
उमरखेड : गत आठ दिवसात तालुक्यात झालेल्या दमदार पावसाने शेतकऱ्यांची पेरणीची लगबग वाढली आहे. खते आणि बियाणे खरेदीसाठी शेतकरी धडपडत असताना तालुक्यातील काही कृषी केंद्र चालकांकडून खत आणि बियाण्यांचे लिंकिंग केले जात आहे. अमूक बियाणे हवे असेल तर हे खत घ्यावे लागेल, असे सांगितले जात आहे. तसेच कापूस व सोयाबीनच्या बियाण्यांची कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे.
गत वर्षी दुष्काळ व नापिकीमुळे तालुक्यातील शेतकरी मेटाकुटीस आले होते. त्यातून थोडाफार दिलासा मिळण्यासाठी प्रत्येक शेतकरी खरिपाची आस धरुन बसला आहे. यावर्षी पावसाने दमदार हजेरी लावल्याने काही ठिकाणी पेरण्या सुरू झाल्या आहेत. त्यातच कर्ज पुनर्गठणात जाचक अटी असल्याने शेतकरी पैशासाठी दारोदार फिरत आहे. अनेकांनी दागिने गहाण ठेऊन बियाणे खरेदीची व्यवस्था केली आहे. मात्र बाजारात व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना वेठीस धरण्यासाठी बियाणे टंचाईचे जाळे टाकले आहे.
यंदा अनेक शेतकरी सोयाबीन पिकाकडे धाव घेत आहे. मा९ अनेक शेतकरी बीटी कपाशी लागवडीवर जोर देत आहे. तालुक्यात उमरखेड, ढाणकी, जेवली, बिटरगाव, दराटी, निंगनूर, विडूळ, चातारी, बाभूळगाव, खरुस, देवसरी, मुळावा पोफाळी, कुपटी, सुकळी इत्यादी गावात ६७ कृषी केंद्र आहेत. त्यातील अनेक कृषी केंद्र चालक रासायनिक खते, बियाणे, कीटकनाशक औषधी यांची लिंकिंग करीत आहे. परंतु या सर्व गंभीर बाबीकडे तालुका कृषी अधिकारी दुर्लक्ष करीत आल्याचा आरोप आहे. प्रत्येक जण कृषी केंद्राकडे नामांकित बियाण्याची मागणी करत आहे. मात्र उमरखेड शहरातील कृषी केंद्र संचालकांनी जास्त मागणी असलेल्या कपाशी, सोयाबीन रासायनिक खताची बाजारात कृत्रिम टंंचाई निर्माण केली आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. एकीकडे शासन शेतकऱ्यांना वाटेल ते बियाणे उपलब्ध करून देण्याची घोषणा करत आहे. मात्र बियाणे बाजारातील साठेबाजींनी शेतकऱ्यांचा छळ सुरू केला आहे. शेतकऱ्यांची बियाणे बाजारात सुरू असलेल्या आर्थिक पिळवणूक बाबत कोणीही बोलायला तयार नाही. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवावी अशी मागणी आहे. (शहर प्रतिनिधी)

बोगस बियाण्यांची भीती कायम
उमरखेड तालुक्यात सध्या बियाण्यांची कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे. बियाणे मिळत नसल्याने शेतकरी वाट्टेल तेथून बियाणे घेण्याचा प्रयत्न करीत आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांच्या माथी बोगस बियाणे मारले जाण्याची शक्यता आहे. गत काही वर्षात बोगस बियाण्यांमुळे शेतकरी उद्ध्वस्त झाले आहे. तक्रार करूनही कुणी दखल घेत नाही. यातून शेतकरी फसविला जातो. या सर्व प्रकारावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी कृषी विभागाची असते. परंतु कृषी विभागाचेच अनेक अधिकारी आणि कर्मचारी कृषी केंद्र चालकांच्या दावणीला बांधल्याचे दिसून येते. याप्रकरणी संबंधितांवर कडक कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. परंतु कुणी लक्ष देण्याची शक्यता दिसत नाही.
उमरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेती विषयी कुठलीही तक्रार किंवा कृषी केंद्र चालकाकडून, पिळवणूक होत असेल तर त्याची तक्रार तहसील कार्यालयाकडे करावी. शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या कृषी केंद्र चालकाची सखोल चौकशी करून त्याचे कार्यवाही केली जाईल. शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाकडे व कृषी विभागाकडे लेखी तक्रार करावी.
- सचिन शेजाळ, तहसीलदार, उमरखेड

उमरखेड तालुक्यात ६७ कृषी केंद्र आहेत. यामध्ये कुठलाही गैरप्रकार नाही. बियाण्यांचे लिकिंग ही होत नाही. कीटकनाशक, कापूस, सोयाबीन इत्यादी बियाणे यांची कृत्रिम टंचाई करून शेतकऱ्याला त्रास दिला तर शेतकऱ्यांनी थेट उमरखेड तालुक कृषी अधिकारी कार्यालयात येऊन तक्रार नोंदवावी. दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.
- एस.के. राठोड, तालुका कृषी अधिकारी, उमरखेड

Web Title: Fertilizers and seeds linking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.