सासरा व जावयाला जन्मठेप
By Admin | Updated: June 5, 2015 00:12 IST2015-06-05T00:12:10+5:302015-06-05T00:12:10+5:30
जावई व सासरा दोघेही दारूच्या आहारी गेले. एकत्र राहणाऱ्या या दोघांनीही आपआपल्या पत्नीला एकाच वेळी पेटवून दिले.

सासरा व जावयाला जन्मठेप
दोघांनीही पत्नीला जाळले : एकीचा मृत्यू, दुसरी बनली साक्षीदार
यवतमाळ : जावई व सासरा दोघेही दारूच्या आहारी गेले. एकत्र राहणाऱ्या या दोघांनीही आपआपल्या पत्नीला एकाच वेळी पेटवून दिले. त्यात एकीचा मृत्यू झाला तर दुसरी सुर्दैवाने वाचल्याने या घटनेची प्रत्यक्षदर्शी साक्षीदार बनली. तिची हीच साक्ष ग्राह्य मानून येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.बी. ठाकरे यांनी गुरुवारी या जावई व सासऱ्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
जितेंद्र नगराळे (३७) असे या जावयाचे तर अशोक चहांदे (दोन्ही रा. समतानगर वडगाव रोड यवतमाळ) असे सासऱ्याचे नाव आहे. जितेंद्रने पत्नी कल्पनाला तर अशोकने रत्नकला हिला जाळले होते. त्यात कल्पनाचा मृत्यू झाला. मात्र रत्नकलाने उपचाराला प्रतिसाद दिल्याने तिचा जीव वाचला आणि या खटल्यात तिचीच साक्ष क्ररकर्म्या आरोपींना शिक्षा देण्यासाठी पुरेशी ठरली.
परिचारिका असलेल्या कल्पनाचा विवाह नात्यातीलच जितेंद्र नगराळे सोबत झाला होता. लग्नापासून ती आपल्या पतीसह वडिलांच्या घरातच रहात होती. पती जितेंद्र आणि वडील अशोक दोघांनाही दारुचे व्यसन होते. घराची जबाबदारी कल्पना आणि तिची आई रत्नकला या दोघींवरच होती. पैशासाठी जितेंद्र आणि अशोक या मायलेकींना त्रास देऊन वाद घालत होते. रोजच्या कटकटीला कंटाळून कल्पना व तिच्या आईने घटनेच्या चार दिवसापूर्वी वडगाव रोड ठाण्यात पती व वडिलांविरोधात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी दोघांनाही अटक केली. २३ मार्च २०१३ रोजी त्या दोघांची जामीनावर सुटका झाली. त्यानंतर घरी येऊन दोघांनी कल्पना व तिच्या आई रत्नकला यांचा वचपा काढण्यासाठी आरोपी जितेंद्र व अशोकने सुतळीचा टेंभा करून दोघेही मायलेकीच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. घटनेत कल्पना ही ९० टक्के जळाली तर रत्नकला ५४ टक्के जळाली. गंभीर अवस्थेत त्यांनी स्वत:च शासकीय रुग्णालय गाठले. उपचारादरम्यान शासकीय रुग्णालयात मृत्यूपूर्व बयाण घेण्यात आले. अधिक उपचारासाठी तिला सावंगी रुग्णालयात दाखल केले असता तिचा २७ मार्च २०१३ रोजी मृत्यू झाला. तर कल्पनाची आई रत्नकला अशोक चहांदे ही यातून सुर्दैवाने बचावली. तिनेच दिलेल्या तक्रारीवरून आरोपी जितेंद्र आणि अशोक यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या खटल्यात तब्बल १७ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये आई रत्नकला चहांदे, डॉ. रॉबीन गुप्ता, यशवंत दुर्गे, नायब तहसीलदार माळवी यांची साक्ष महत्वाची ठरली. सहायक पोलीस निरीक्षक नरेश पिंपळकर यांची साक्षसुद्धा या खटल्यात महत्त्वाची ठरली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी.बी. ठाकरे यांनी आरोपींना खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेप, जीवे मारण्याच्या प्रयत्नात पाच वर्षाची शिक्षा, १० हजार दंड, दंड न भरल्यास एक वर्षाची शिक्षा सुनावली. सरकारी अभियोक्ता पी.व्ही. गाडबैले यांनी बाजू मांडली. (कार्यालय प्रतिनिधी)