पुत्रांऐवजी पित्यांनीच घेतली रिंगणात उडी
By Admin | Updated: September 29, 2014 00:50 IST2014-09-29T00:50:47+5:302014-09-29T00:50:47+5:30
राजकीय आखाड्यात आपल्या पुत्रांना पुढे आणण्याचा मनसुबा केलेल्या नेत्यांना बदलत्या राजकीय समीकरणाने स्वत:च रिंगणात उडी घ्यावी लागली. ऐन वेळी पुत्रांना घरी बसवत

पुत्रांऐवजी पित्यांनीच घेतली रिंगणात उडी
विधानसभेत बदलते समीकरण : अनुभवाअभावी पराभवाची भीती
यवतमाळ : राजकीय आखाड्यात आपल्या पुत्रांना पुढे आणण्याचा मनसुबा केलेल्या नेत्यांना बदलत्या राजकीय समीकरणाने स्वत:च रिंगणात उडी घ्यावी लागली. ऐन वेळी पुत्रांना घरी बसवत पित्यांनीच नामांकन दाखल केले. अटीतटीच्या या लढाईत पुत्राचा पराभव झाला तर आपल्या राजकीय भविष्याचे काय या भीतीतून हा पवित्रा घेतल्याची चर्चा आहे.
राजकारणात घराणेशाहीचा वारसा चालविण्याची धडपड प्रत्येकच नेत्याकडून केली जाते. याला मतदारांनीही भरभरून प्रतिसाद दिला आहे. मात्र यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी बदलेल्या समीकरणाने घराण्याचा वारसा चालविण्यासाठी रिंगणात येवू इच्छिणाऱ्या पुत्रांना माघार घ्यावी लागली. जिल्ह्याच्या राजकारणात पुसद विधानसभेला नाईक घराण्याचा वारसा लाभला आहे. महाराष्ट्राच्या स्थापनेपासून याच घराण्यातील व्यक्तीने येथे प्रतिनिधित्व केले आहे. यंदाच्या निवडणुकीत मनोहरराव नाईक यांनी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष असलेल्या पुत्राला रिंगणात उतरविण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. तशी चाचपणी पूर्ण झाली होती. नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दोन दिवसात राज्यातील राजकीय समीकरणे एकदम बदलली. युती आघाडी फुटली. अशा या बदलत्या राजकारणात खुद्द मनोहरराव नाईकांनीच आपली उमेदवारी पुसद मतदारसंघातून दाखल केली.
वणी मतदारसंघात आपल्यावरची असलेली नाराजी काही प्रमाणात का होई ना दूर करण्यासाठी काँग्रेस जिल्हाध्यक्ष वामनराव कासावार यांनी मुलाचे राजकीय लाँचिंग सुरू केले होते. विधानसभा क्षेत्रात प्रत्येक लहान-मोठ्या कार्यक्रमात कासावार पुत्रांची आवर्जून उपस्थिती राहात होती. भविष्यातील आमदार म्हणूनच त्यांना प्रोजेक्ट केले जात होते. कार्यकर्त्यांच्या आणि जनतेच्या मनातही ही बाब बिंबविण्याचा यथावकाश प्रयत्न गेल्या वर्षभरापासून करण्यात आला. राजकीय सरिपाटावर घडलेल्या उलाढालीमुळे मुलाचा टिकाव लागणार नाही याचा अंदाज आल्याने स्वत: कासावार यांनीच निवडणुकीत शड्डू ठोकला आहे. जिल्ह्यातील ज्येष्ठ मंत्री आणि काँग्रेसचे नेते शिवाजीराव मोघे यांनी सुद्धा आपला मुलगा जितेंद्र यांना विविध माध्यमातून पुढे आणण्याचा प्रयत्न सुरू केला होता. खऱ्या अर्थाने जितेंद्रच्या राजकीय परीक्षेची सुरुवात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीतूनच झाली. या काळात संपूर्ण प्रचार यंत्रणा जितेंद्रच्या हातात होती. वडील दिल्लीत आणि आपण मुंबईत पोहचू अशी खात्री होती. त्या पद्धतीने नियोजनही करण्यात आले होते. मात्र सातत्याने अनिश्चित असलेल्या राजकारणात नियोजित बाबींना वेळेवर बगल देण्याशिवाय कुठलाही पर्याय नसतो. मतदारसंघातील बदलते समीकरण आणि लोकसभेच्या निकालाने शिवाजीराव मोघेंचा निर्णय बदलला. आता स्वत:च निवडणूक रिंगणात मोघे उतरले आहे. मुलाला रिंगणात उतरवून ऐनवेळी दगाफटका झाल्यास आपल्या राजकीय भविष्याचे काय अशी शंका त्यांना सतावत असल्याची चर्चा आहे. त्यातूनच स्वत:च निवडणूक रिंगणात त्यांनी उडी घेतली. या उलट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे मात्र अपवाद ठरले. त्यांनी आपल्या मुलाच्या तिकिटासाठी जीवाचे रान केले. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी तिकिट मिळविण्याचे प्रयत्न केले. तसे पाहता माणिकराव विधान परिषदेचे सदस्य आहे. तसेच प्रदेशाध्यक्षही आहे. परिणामी त्यांना मुलाला पुढे आणण्यासाठी प्रयत्नांची सिकस्त करावी लागली. एकंदरित जिल्ह्याच्या राजकारणात आतापर्यंतचा इतिहास बघितला तर राजकीय घराण्यांनी आपल्या वारसांनाच पुढे आणले. कधी काकाने पुतण्याला तर वडिलाने पुत्राला पुढे आणले. जनतेने काही पुत्रांना स्वीकारले तर काहींना नाकारल्याची उदाहरणेही जिल्ह्यात आहे.
(कार्यालय प्रतिनिधी)