पांदण रस्त्यांच्या दुरवस्थेने शेती कठीण
By Admin | Updated: May 24, 2014 00:13 IST2014-05-24T00:13:20+5:302014-05-24T00:13:20+5:30
शेतकर्यांच्या शेती व्यवसायात अत्यंत महत्वाचा ठरणारा पांदण रस्ता दिवसेंदिवस निरूंद होत असल्याने शेतकर्यांना शेतीच करणे कठीण झाले आहे. यातून भांडण, तंटा करण्यातच त्यांचा वेळ

पांदण रस्त्यांच्या दुरवस्थेने शेती कठीण
मुकुटबन : शेतकर्यांच्या शेती व्यवसायात अत्यंत महत्वाचा ठरणारा पांदण रस्ता दिवसेंदिवस निरूंद होत असल्याने शेतकर्यांना शेतीच करणे कठीण झाले आहे. यातून भांडण, तंटा करण्यातच त्यांचा वेळ नाहक वाया जात आहे. पुढील महिन्यात शेतकर्यांच्या खरील हंगामाला सुरूवात होणार आहे. बळीराजा चांगले उत्पन्न हाती यावे, यासाठी भर उन्हातान्हात शेतीची मशागत करीत आहे. मृग नक्षत्राची चाहूल लागली आणि धारा बरसल्या की पेरणीची करणे सुरू होणार आहे. त्यामुळे शेतात जाण्याचा रस्ता मोकळा करण्यात शेतकरी मश्गुल झाले आहे़ उन्हाळ्याचे चार महिने चांगले गेल्यानंतर त्यांना चिंता वाटते ती पावसाळ्यात शेतात जाण्याची व शेतातील उत्पन्न घरी आणण्याची. कारण ‘पांदण रस्ते’ दिवसेंदिवस निरुंद होत आहे. पांदण रस्त्याची समस्या अत्यंत बिकट झाली असून याच कारणावरून कधी व कुठे वाद होईल, याचा नेम नसतो़ पांदण रस्ते हे शेतकर्यांसाठी अत्यंत महत्वाचे आहे़ मात्र या पांदण रस्त्याकडे कुणाचेही लक्ष नसल्याने शेतकर्यांना पावसाळ्यात अतिशय हाल भोगावे लागतात. पावसाळ्यात त्यांना चिखल तुडवित शेतात जावे लागते़ बैलगाडीसुद्धा अनेकांच्या शेतात जाऊ शकत नाही़ रासायनिक खते व इतर गोष्टी पिकांना वेळेवर न मिळाल्यास शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान दरवर्षी होते. या पांदण रस्त्यांवर आजूबाजूने शेतकर्यांनीच अतिक्रमण करून जमीन बळकाविण्याचे प्रयत्न सुरू केले आहे़ नियमानुसार पांदण रस्ते १२ फूट व शिवरस्ते हे २२ फुटांचे असायला पाहिजे़ परंतु असे न होता, स्वार्थी व हुकुमशाही प्रवृत्तीच्या शेतकर्यांनी हे रस्ते नेमके निम्या फुटावर आणून ठेवल्यामुळे वाद होत आहे. अनेकदा एकाच रस्त्याने अनेक शेतकर्यांना येणे-जाणे करावे लागते़ त्यामुळे वादाची ठिणगी पडते़ सामान्य शेतकरी हा अन्याय अनेक वर्षांपासून सहन करीत आहेत. या समस्येकडे कुणाचेही लक्ष नसल्याने पांदण रस्ते भांडणास कारणीभूत ठरत आहे. एखाद्या शेतकर्याने तक्रार केलीच, तर वेळ मारून नेली जाते़ एखाद्या शेतकर्याने पुढार्यांकडे पांदण रस्त्याची समस्या मांडली की, ते मात्र मतांचे राजकारण, नातेसंबंध, वैमनस्य, फायदा व तोट्यांचा विचार करून त्याकडे डोळेझाक करतात. सध्या प्रत्येक गावात रोहयोची कामे झाली. मात्र बोटावर मोजण्याइतपत गावात पांदण रस्त्याचे काम त्यातून करण्यात आले. अनेक गावात पांदण रस्त्याची समस्या कायम आहे. मुकुटबन येथे सुरू असलेल्या रूईकोट शिवारात खुल्या कोळसा खाणीने तर संपूर्ण शिवधुराच नष्ट केला. त्यामुळे शेतकर्यांना शेती कसणे कठीण झाले आहे. महसूल प्रशासनाने शेतकर्यांच्या तक्रारींची दखल घेऊन पांदण रस्ते व शिवधुरा मोकळे करून देण्याची मागणी आहे़ (शहर प्रतिनिधी)