पाणीटंचाईत शेतशिवारांचा आधार

By Admin | Updated: April 25, 2016 02:15 IST2016-04-25T02:15:36+5:302016-04-25T02:15:36+5:30

तालुक्यातील माळपठार भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून गावकऱ्यांना शेतशिवारातील विहिरी आणि हातपंपांचा आधार घ्यावा लागत आहे.

Farming support for water scarcity | पाणीटंचाईत शेतशिवारांचा आधार

पाणीटंचाईत शेतशिवारांचा आधार

बेलोरात भीषण स्थिती : विहिरी व हातपंपांनी तळ गाठला
पुसद : तालुक्यातील माळपठार भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून गावकऱ्यांना शेतशिवारातील विहिरी आणि हातपंपांचा आधार घ्यावा लागत आहे. बेलोरा आणि रामपूरनगर येथे निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नागरिक डोक्यावर हंडे घेऊन शिवाराची वाट धरत आहे.
पुसद तालुक्याचे वाळवंट म्हणून माळपठार भाग ओळखला जातो. या भागातील बेलोरा येथे गत काही दिवसांपासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे या परिसरात ४० गाव माळपठार प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहे. परंतु या योजनेलाही अखेरची घरघर लागली आहे. या योजनेचे आठ दिवस आड तेही अपुरे पाणी मिळत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. गावातील विहिरींनी तळ गाठल्याने गावानजीकच्या शेतात पाण्यासाठी जावे लागते. तसेच वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी तासन्तास शेतात थांबावे लागते.
रात्री-बेरात्री शेतात जावे लागत आहे. शेतकऱ्याच्या मर्जीनुसार पाणी मिळवावे लागते. नाईलाज असल्याने नागरिक या शेतांमधील विहिरी व हातपंपावर जाऊन शेतमालकाची विणवणी करून पाणी भरताना दिसतात.
प्रादेशिक पाणी पुरवठा योजना पूर्णत्वाने कार्यान्वित करून या योजनेच्या पाईपलाईनला लागलेली गळती रोखल्यास नागरिकांना दोन दिवसाआड पाणी मिळू शकते. परंतु जीवन प्राधिकरणाचे अधिकारी लक्ष देत नसल्याने या भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Farming support for water scarcity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.