इच्छाशक्तीच्या जोरावर शेती हिरवीगार
By Admin | Updated: August 4, 2015 02:35 IST2015-08-04T02:35:18+5:302015-08-04T02:35:18+5:30
वरुण राजा रूसला. बळीराजा हताश झाला. शासनही चिंतेत पडले. मात्र मांजर्डाच्या ५५ वर्षीय शेतकऱ्याने दुर्दम्य

इच्छाशक्तीच्या जोरावर शेती हिरवीगार
मांजर्डा : ५५ वर्षीय शेतकऱ्याचे दुष्काळाशी दोन हात, चांगल्या उत्पादनाचा विश्वास
यवतमाळ : वरुण राजा रूसला. बळीराजा हताश झाला. शासनही चिंतेत पडले. मात्र मांजर्डाच्या ५५ वर्षीय शेतकऱ्याने दुर्दम्य इच्छाशक्ती आणि जिद्दीच्या जोरावर शेती हिरवीगार केली आहे. त्यांनी १८ एकरात घेतलेले सोयाबीन सध्या फुल आणि कळीच्या अवस्थेत आहे. या शेतकऱ्याने यासाठी कुठली जादू केली नाही, तर केवळ प्रयत्नातून आलेल्या संकटावर मात केली आहे. त्याचा हा प्रयत्न निश्चितच प्रेरणास्रोत आहे.
यवतमाळ तालुक्याच्या मांजर्डा येथील मोहन राठोड या शेतकऱ्याची ही यशकथा आहे. चांगला पाऊस होण्याच्या आशेने पेरणी केली. मात्र पावसाने बरीच विश्रांती घेतल्याने पिके वाळून जाण्याच्या स्थितीत आली. यावर चिंता करत न बसता त्यातून मोहन राठोड यांनी मार्ग शोधला. १८ एकरात पेरलेले सोयाबीन जगवायचेच या इच्छाशक्तीवर त्यांनी प्रयत्न सुरू केले. तसा सुरुवातीपासूनच त्यांचा प्रयत्न राहिला. पाण्याचा योग्य वापर, योग्य खते आणि औषधांची निवड केली. लष्करी आणि उंट अळीचा बंदोबस्त करण्यासाठी कीटकनाशकाची फवारणी केली. सुरुवातीलाच घेतलेली ही दक्षता आता पाऊस नसतानाही पिके टवटवीत राहण्यासाठी उपयोगी ठरली आहे.
सध्याच्या हवामानातील बदल आणि हलकासा पाऊस यामुळे त्यांच्या सोयाबीन पिकाची चांगली वाढ झाली आहे. एकरी १० क्विंटल सोयाबीन होण्यासोबतच दाणेही वजनदार आणि टपोरे राहील, असा विश्वास त्यांना आहे. निसर्गाचा लहरीपणा या प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी केलेल्या उपाययोजना आज फायद्याच्या ठरत आहे.
जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाची तयारी असेल तर कुठलेही संकट दूर सारता येते, हेच मोहन राठोड या शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. (वार्ताहर)