शेतीपूरक व्यवसायाची वानवा
By Admin | Updated: July 13, 2015 00:14 IST2015-07-13T00:14:56+5:302015-07-13T00:14:56+5:30
राळेगावात पशुधन घटले : लोकप्रतिनिधींकडून पाठपुराव्याची अपेक्षा

शेतीपूरक व्यवसायाची वानवा
राळेगाव : शेती हा व्यवसाय अनिश्चिततेचा झाला आहे. दरवर्षी निर्माण होणाऱ्या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी अडचणीत येत आहे. यातून सावरण्यासाठी तालुक्यात शेतीपूरक व्यवसायाची गरज निर्माण झाली आहे. तालुक्याशी संबंधित लोकप्रतिनिधींनी यासाठी पाठपुरावा करावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
तालुक्यात पशुधनही कमालीचे घटल्याने दुग्धोत्पादनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पूर्वी शेतकऱ्यांकडे एक तरी दुधाळ जनावर राहात होते. शेणाचा उपयोग शेतात खतासाठी होत होता. त्यामुळे शेतातील जमिनीचा कस उत्पादन वाढीसाठी फायदेशीर रहात होता. दूधविक्रीतून चार पैसे हातात खेळत राहिल्याने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती समाधानकारक रहात होती. मात्र अलिकडे विविध कारणांमुळे पशुधनामध्ये घट झाली आहे. चारा आणि पाणी टंचाई हे यातील प्रमुख कारण आहे.
३०-४० वर्षांपूर्वी राळेगाव तालुक्यातील अनेक गावातून संकलित झालेले दूध जिल्ह्याच्या ठिकाणी पाठविले जात होते. आज अनेक कंपन्यांना दुधाची फार मोठ्या प्रमाणावर गरज आहे.
यासाठी शेतकऱ्यांची पशुधन पालनासाठी मानसिकता तयार करण्याची गरज आहे. दुधावर प्रक्रिया करणारे उद्योग, प्रशिक्षण, दुधाळ जनावरे खरेदी करण्यात कर्ज सुविधा आदींची प्राथमिक आणि मूलभूत सोय याठिकाणी निर्माण होण्यास प्रयत्न करण्याची गरज आहे. तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी यासाठी पाठपुरावा करावा अशी अपेक्षा शेतकरी आणि नागरिकांमधून व्यक्त होत आहे. (तालुका प्रतिनिधी)