शेतकऱ्यांना चिंता बियाणे आणि खतांची
By Admin | Updated: May 24, 2015 00:03 IST2015-05-24T00:03:21+5:302015-05-24T00:03:21+5:30
मृग नक्षत्र अवघ्या दोन आठवड्यावर आले असून, शेतकऱ्यांना बियाणे आणि खताची चिंता लागली आहे.

शेतकऱ्यांना चिंता बियाणे आणि खतांची
बँकांची नकारघंटा : महागाव तालुक्यावर दुष्काळाचे सावट कायम
महागाव : मृग नक्षत्र अवघ्या दोन आठवड्यावर आले असून, शेतकऱ्यांना बियाणे आणि खताची चिंता लागली आहे. दुष्काळात होरपळलेल्या बहुतांश शेतकऱ्यांनी आता मशागतीला प्रारंभ केला आहे. रोहिणी नक्षत्रातच पाऊस कोसळल्यास ऐनवेळेवर शेतकऱ्यांची मोठी त्रेधा उडणार आहे. त्यातच थकित कर्जदारांना बँकांन कर्ज देण्यास नकार दिल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
महागाव तालुक्यात ८८ हजार ५५६ हेक्टर जमीन वहिती खाली आहे. कापूस, ज्वारी, तूर, सोयाबीन, उडीद, मुग आदी पिकांची लागवड खरीप हंगामात केली जाते. काळी कसदार जमीन आणि पैनगंगा व पुस नदीचा सुपीक प्रदेश असला तरी दुष्काळाने गत काही वर्षांपासून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. कधी कोरडा तर कधी ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागतो. यावर्षी शेतकऱ्यांना कोरड्या दुष्काळाला सामोरे जावे लागले. कापूस, सोयाबीन हातचे गेले. रबी हंगामात गारपीटीने उद्ध्वस्त केले. अशा स्थितीत आता खरीप हंगाम आला आहे. शेतकरी मशागतीच्या तयारीत एक छदामही त्यांच्या हाती नाही. ट्रॅक्टरने मशागतीचे दर वधारले असून, शेतकऱ्यांना ट्रॅक्टर मालकांची मनधरणी करावी लागत आहे. मान्सून अंदमानमध्ये सक्रिय झाल्याचे वृत्त धडकताच शेतकऱ्यांची लगबग वाढली. त्यासोबतच चिंतेतही वाढ झाली आहे.
आगामी खरीप हंगामात पेरणीसाठी शेतकऱ्यांनी चाचपणी सुरू केली. बियाणे आणि खते खरेदीसाठी अद्यापही शेतकऱ्यांजवळ पैसे दिसत नाही. थकित कर्जदारांना कर्ज द्यायचे नाही असे बँकांचे धोरण आहे. त्यामुळे आगामी खरीप हंगामात पेरणी कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. बँकांनी कर्ज दिले नाही तर सावकाराच्या दारातच शेतकऱ्यांना जाण्याची वेळ येणार आहे. गत वर्षीचे पैसे थकित असल्याने कृषी केंद्र चालकही उधारीवर बियाणे देण्यास तयार नाही. त्यामुळे यावर्षीचा खरीप हंगाम सुरूवातीलाच शेतकऱ्यांना कठीण जाणार आहे. त्यात दुबार आणि तिबार पेरणीची वेळ आली तर शेतकरी पुरता उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही.
(तालुका प्रतिनिधी)
गत कही वर्षांपासून शेतीच्या कामासाठी मजूरच मिळत नाही. यंदाही तशीच स्थिती आहे. नांगरणी, वखरणी ट्रॅक्टरच्या सहाय्याने केली जाईल. मात्र काही ठिकाणी मनुष्यबळाचीच आवश्यकता असते. त्यासाठी मजूर मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत दिसत आहे. कुणीही कामावर यायला तयार नाही.