अतिवृष्टीतून सावरण्यासाठी अर्ली व्हेरायटीकडे शेतकऱ्यांची धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 05:00 IST2021-09-15T05:00:00+5:302021-09-15T05:00:17+5:30

एकूण लागवड करताना लवकरात लवकर सोयाबीनचे वाण हातात यावे आणि दुसरे पीकही लावता यावे, याकरिता शेतकऱ्यांनी अर्ली व्हेरायटीची निवड केली. आता सोयाबीनच्या दरात वाढ असली तरी संपूर्ण सोयाबीन निघाल्यानंतर सोयाबीनचे दर पुन्हा घसरतात. याचा अनुभव शेतकऱ्यांना आहे. परतीच्या पावसापासून संरक्षण मिळविण्यासाठी लावलेली अर्ली व्हेरायटी सततच्या पावसाने पुन्हा धोक्यात आली आहे. तर लांब कालावधीचे सोयाबीनही पावसाच्या फेऱ्यात अडकले आहे.

Farmers rush to Early Variety to recover from heavy rains | अतिवृष्टीतून सावरण्यासाठी अर्ली व्हेरायटीकडे शेतकऱ्यांची धाव

अतिवृष्टीतून सावरण्यासाठी अर्ली व्हेरायटीकडे शेतकऱ्यांची धाव

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : सोयाबीनची पेरणी यावर्षी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यासोबतच संशोधित वाण आणि अर्ली व्हेरायटी लागवडीकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात वळले आहेत. परतीच्या पावसाने सोयाबीनचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांनी हा पर्याय निवडला होता. मात्र, निसर्गाचा लहरीपणा कायम राहिल्याने आता अर्ली आणि लांबपल्ल्याच्या वाणालाही धोका निर्माण झाला आहे. 
एकूण लागवड करताना लवकरात लवकर सोयाबीनचे वाण हातात यावे आणि दुसरे पीकही लावता यावे, याकरिता शेतकऱ्यांनी अर्ली व्हेरायटीची निवड केली. आता सोयाबीनच्या दरात वाढ असली तरी संपूर्ण सोयाबीन निघाल्यानंतर सोयाबीनचे दर पुन्हा घसरतात. याचा अनुभव शेतकऱ्यांना आहे. परतीच्या पावसापासून संरक्षण मिळविण्यासाठी लावलेली अर्ली व्हेरायटी सततच्या पावसाने पुन्हा धोक्यात आली आहे. तर लांब कालावधीचे सोयाबीनही पावसाच्या फेऱ्यात अडकले आहे.

शेतकरी म्हणतात...

गतवर्षी जास्त कालावधी घेणाऱ्या सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला होता. एकरी उत्पन्न घटल्याने सर्वाधिक लागवड अर्ली व्हेरायटीची झाली. जवळपास ७० टक्के शेतकऱ्यांनी असे वाण लावले आहे. मीसुद्धा याच वाणाचा प्रयोग केला आहे. मात्र, पावसाने धडकी भरली आहे. 
- पिंटू घुले, शेतकरी

इतर पिकांपेक्षा सोयाबीनला येणारा खर्च कमी आहे. याशिवाय सोयाबीन काढल्यानंतर दुसरे पीकही घेता येते. याशिवाय मजुराची कटकट नाही. यामुळे शेतकरी सोयाबीन लागवडीकडे वळत आहे. या व्यतिरिक्त इतर पीक घेताना अधिक खर्च होतो. शिवाय, उत्पन्नही कमी येते. 
- अनुप चव्हाण, शेतकरी

काळानुसार बदल
जिल्ह्यात सोयाबीनच्या क्षेत्रात २०१९ पर्यंत वाढ झाली. त्यानंतर हे क्षेत्र कमी झाले. आता पुन्हा सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होत आहे. यासोबतच शेतकरी अर्ली व्हेरायटी लागवड करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बियाणे मागत आहेत. प्रत्येकांचा वेगळा अनुभव आहे. त्यानुसार लागवड झाली आहे.
- नवनाथ कोळपकर, कृषी अधीक्षक

 झटपट येणारे सोयाबीन 
सोयाबीनमध्ये विविध संशोधित वाण बाजारात आले आहे. यामध्ये अर्ली व्हेरायटी सर्वाधिक लोकप्रिय होत आहे. झटपट हातात येणारे पीक म्हणून त्याकडे पाहिले जाते.
 मध्यम कालावधीत येणारे सोयाबीन 
अल्पावधित हाती येणाऱ्या पिकासोबतच मध्यावधीतही हाती येणारे सोयाबीनचे वाण बाजारात आले आहे. साधारणत: ९० दिवसात हे सोयाबीन निघते.
 जास्त कालावधीत येणारे सोयाबीन 
३३५ जातीचे ११० दिवसांचे जास्त कालावधीचे आणि १२० दिवसांचे संकरित वाण बाजारात आहे. ऋतूचक्र बदलल्याने हे सर्व वाण धोक्यात आले आहे.

 

Web Title: Farmers rush to Early Variety to recover from heavy rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती