सिंचन करताना विजेच्या धक्क्याने शेतकरी ठार

By Admin | Updated: February 1, 2015 23:04 IST2015-02-01T23:04:40+5:302015-02-01T23:04:40+5:30

वीज वितरण कंपनीची परवानगी नसताना अनधिकृत जोडणी करून वीज पुरवठा घेण्यात आला. खासगी वायरमनच्या सहाय्याने केलेला हा उपद्व्याप शेतकऱ्याच्या अंगावरच उलटला.

Farmers killed by irrigation during the irrigation | सिंचन करताना विजेच्या धक्क्याने शेतकरी ठार

सिंचन करताना विजेच्या धक्क्याने शेतकरी ठार

यवतमाळ : वीज वितरण कंपनीची परवानगी नसताना अनधिकृत जोडणी करून वीज पुरवठा घेण्यात आला. खासगी वायरमनच्या सहाय्याने केलेला हा उपद्व्याप शेतकऱ्याच्या अंगावरच उलटला. ही गंभीर घटना राळेगाव तालुक्यातील दहेगाव येथील शेतात घडली. याप्रकरणी खासगी वायरमनसह मृतावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राळेगाव तालुक्यातील दहेगाव येथील शेतात गोपाळ महादेव काळे (४५) याने सिंचनासाठी बोअरवेल खोदली होती. या बोअरवेलवर मोटरपंप बसविण्यात आला. मात्र अर्ज सादर करूनही आणि पाठपुरावा करूनही वीज जोडणीची मंजुरात मिळाली नाही.
त्यामुळे गोपाळ काळे याने गावातीलच खासगी वायरमन अनिल विनायक लाटकर याला बोलावून दोघांनी संगणमताने वीज वितरण कंपनीच्या वाहिनीवरून अनधिकृत जोडणी केली. त्यानंतर सिंचन करीत असताना तांत्रिक त्रृटी राहुन वीज प्रवाह पाण्यात शिरला. या पाण्याला स्पर्श होऊन गोपाळ जागीच कोसळला. विज प्रवाहाचा तीव्र झटका बसल्याने तो जागीच ठार झाला. ही बाब लक्षात येताच त्याला रुग्णालयात नेण्यात आले.
मात्र डॉक्टरांनी घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच वडकीचे ठाणेदार अमोल माळवे, एएसआय राऊत यांच्या पथकाने पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. तसेच सहाय्यक फौजदार राऊत यांच्या तक्रारीवरून खासगी वायरमन अनिल लाटकर आणि मृत काळेवर घटनेला जबाबदार असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. अनधिकृत वीज जोडणी घेतल्याने जिल्ह्यात असे अनेक अपघात घडले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Farmers killed by irrigation during the irrigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.