खरिपात शेतकऱ्यांचे हाल
By Admin | Updated: June 19, 2016 02:24 IST2016-06-19T02:24:51+5:302016-06-19T02:24:51+5:30
नैसर्गिक आपत्ती व दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ऐन खरीप हंगामात तगमग सुरू आहे. बी-बियाणे घेण्याकरिताही त्यांच्याकडे पैसा नाही.

खरिपात शेतकऱ्यांचे हाल
बियाणांची सोय नाही : दुष्काळी स्थितीमुळे चारा डेपोची गरज
पुसद : नैसर्गिक आपत्ती व दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ऐन खरीप हंगामात तगमग सुरू आहे. बी-बियाणे घेण्याकरिताही त्यांच्याकडे पैसा नाही. त्यामुळे पीककर्जाचे तातडीने पुनर्गठन करून चारा डेपो सुरू करण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे.
शासनाकडून यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून घोषित झाला. परंतु अद्यापपर्यंत सन २०१० ते १३-१४ पर्यंतच्या कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले नाही. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी गांजला आहे. तो आर्थिक हलाखीचा सामना करीत आहे. त्यामुळे शासनाने केवळ एक-दोन वर्षाचे नव्हे तर मागील पाच वर्षातील पीककर्जाचे पुनर्गठन करण्याची नितांत आवश्यकता आहे.
दुष्काळी परिस्थिती पाहता शासनाने चारा डेपो सुरू करण्याची गरज होती. परंतु त्या दृष्टीने हालचाली झालेल्या नाही. जनावरांना चारा उपलब्ध नसल्याने दुभत्या जनावरांचा मृत्यू होण्याच्या घटना वाढत आहे. एकीकडे खरीप हंगामात लागवड कशी करावी, या चिंतेत शेतकरी असताना पीक विम्याची रक्कम कर्जात कपात केली जात आहे. प्रशासनाकडून या प्रकारे शेतकऱ्यांवर दुहेरी वार केला जात आहे. राष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत पुसद तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप पिकासाठी मिळालेली पीक विम्याची २७ कोटींची रक्कम कर्जात कपात न करता तत्काळ त्यांच्या खात्यात जमा करण्याची गरज आहे. या मागण्यापूर्ण झाल्यास तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. (प्रतिनिधी)
दोन संघटनांनी उठविला आवाज
कर्जाचे पुनर्गठन करावे, चारा डेपो सुरू करावा, पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात तत्काळ जमा करावी या मागणीसाठी दोन संघटनांनी आवाज उठविला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण पुलाते, विश्वजीत लांडगे, भारत वानखेडे, कपिल आबाळे, रवी तायडे, महादेव तोडकर, दिनेश ठाकूर, सुभाष कांगळे, अवधूत मस्के, राजाभाऊ डहाके, अवधूत शेळके, संजय बोटवारे आदींनी या संदर्भात तहसीलदार डॉ.संजय गरकल यांना शनिवारी निवेदन दिले. तर परिवर्तन सामाजिक संघटनेचे बळवंत मनवर, रिपब्लिकन सेना प्रमुख संजय इंगोले, आनंद कांबळे, संतोष अंभोरे, बाबुराव वाघमारे, सुनील पवार, ओंकार राठोड, तुकाराम राठोड, विजय पवार, दिलीप घाटे, प्रभाकर खंदारे, शेषराव डाखोरे, रामजी पाईकराव, लक्ष्मी खंदारे, कमल कांबळे, प्रमोद राऊत, भगवान धुळे, सारंग आडसर, शुभम देवकुळे, भारत साठे, सुनील दवने, अविनाश आखरे आदींनी उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांना निवेदन दिले.